महाराष्ट्राची फार मोठी संख्या लहान गावांमधून राहते. उद्योगधंदे खेड्यांपर्यंत पोचले नसल्याने बहुतेकांची उपजीविका शेतावर चालते. बऱ्याचजणांची शेतजमीन तशी लहान असते. सर्व उत्पादक आपापल्या उत्पादनाचा खर्च काढून त्याप्रमाणे विक्रीची किंमत ठेवू शकतात. शेतकरी निसर्गाच्या लहरीवर, बियाणाच्या गुणवत्तेवर अवलंबून राहून, कष्ट करून शेतीतून उत्पादन काढतो. मात्र त्याच्या शेतमालाच्या विक्रीची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही. त्यामुळे बहुतेक लहान शेतकरी कायम पैशाच्या चिंतेत असल्याचे आपल्याला दिसते.
अशाच एका शेतकऱ्याची… नव्हे, त्याच्या लहान मुलाच्या चिकाटीची ही कथा! लहानशा मातीच्या घरात एक आजोबा आणि त्यांचा नातू राहतो. समोर त्यांचे लहानसे शेत. पूर्ण फिल्म पाहत असताना मधूनमधून त्या लहान मुलाला एक स्वप्न पडलेले दिसते. घराबाहेर एका उंचवट्यावर तो उभा आहे आणि त्याचे वडील सायकलला एक पिशवी लावून पायवाटेने दूर निघून जाताना त्याला दिसतात. रात्रीच्या वेळी तो दचकून जागा होतो. घाम पुसतो, डोळे पुसतो आणि पुन्हा झोपतो. आपल्याला कळते की, ह्याचे वडील पोटासाठी दूरदेशी निघून गेलेले आहेत. घरात आता फक्त तो आणि त्याचे आजोबा राहत आहेत. हा मुलगा रोज शाळेत चालत जातो, चांगला अभ्यास करतो पण ज्या कर्जाच्या भीतीने त्याचे वडील गाव सोडून गेले, ते कर्ज फेडून आपले वावर सोडवून घेण्याचा त्याला ध्यास लागला आहे.
आजोबा मजुरी करतायत. त्यावर त्यांची गुजराण होते. मुलगा शेतात जो काही थोडाफार भाजीपाला मिळत असतो, त्याची तोडणी करून एका जरा मोठ्या भाजीवाल्याकडे नेऊन देत असतो. कधी भेंडी, टोमॅटो, मेथीच्या गड्ड्या… तो भाजीवालापण चांगला असतो. त्याला व्यवस्थित पैसे देत असतो. मधूनमधून आजोबा त्याला, किती पैसे जमले ते विचारतात. करताकरता हळूहळू मुलाकडे अठराशे रुपये जमतात. मग आजोबा त्यात थोडी भर घालतात आणि त्याला घेऊन बाजारात जातात. या फिल्ममधली वातावरणनिर्मिती लक्षणीय आहे. दगडधोंडेमाती असलेले लहानसे खेडेगाव. शेत, शेतात आलेली पिके, आठवड्याचा बाजार, गावातली शाळा, तिथली मुलं अगदी अस्सल वाटतात. महाराष्ट्रातील कोणत्याही आडबाजूच्या गावाचे हे प्रातिनिधिक चित्र वाटते. बाजारातून आजोबा एक छान करडू घेऊन येतात. मुलगा त्याला वेळच्यावेळी खाणेपिणे देत राहतो. मोठे झाल्यावर त्या शेळीला राखणीला घेऊन जातो. एक वर्षभरात त्या शेळीबरोबर तिची तीनचार पिल्लेही दिसू लागतात. हळूहळू बारदाना वाढू लागतो. काही शेळ्या, काही बोकड. वडील गावातून निघून गेल्याचे स्वप्न याला पडतच असते. एक दिवस आजोबा नातवाला घेऊन पुन्हा आठवडी बाजारात जातात. एकदोन शेळ्या ठेवून बाकीची जित्राबं विकून टाकतात. त्याचे चांगले पैसे येतात. आजोबा आणि नातू खूश होतात. नातू त्यांना विचारतो, “आता आपले वावर आपल्याला सोडवून घेता येईल ना?’ आजोबा पैसे मोजतात आणि हो म्हणतात. मग नातू आशेने आजोबांना विचारतो, “मग आता माझा बाबाही घरी येईल ना?’ आजोबा म्हणतात, “ते काई सांगता येत नाही. बघू येतो का ते…’ नातू गप्प होतो. आजोबा आणि नातू या दोघांचेही अभिनय इतके हुबेहूब झाले आहेत की, ते खरोखरचेच खेड्यातले साधेसुधे, सच्छील आजोबा आणि हरहुन्नरी मुलगा आहेतसे वाटते.
इतके दिवस चिकाटीने जमवलेले पैसे घेऊन आजोबा आणि नातू सावकाराकडे जातात. सावकार म्हणतात, “फार दिवस लावलेत तुम्ही पैसे परत करायला… मला वाटलं ही जमीन आता माझ्याकडेच राहणार.’ त्यावर आजोबा त्यांना कौतुकानं सांगतात की, सगळी मेहनत नातवानं केली. त्यानं मनावर घेतलं. चिकाटीनं पैशाला पैसा जोडत राहिला म्हणून आमची जमीन परत मिळाली. सावकार मुलाकडे बघून त्याला म्हणतो, “तुझा बाप तर गेला पळून; पण तू मात्र हिंमत दाखवलीस. पैसे जमवून दिलेस आणि स्वतःची जमीन सोडवून घेतलीस.’ मुलाला त्याच्या बोलण्याचा आनंद नाही होत. आपल्या वडिलांचा असा उल्लेख केलेला त्याला आवडत नाही. तो तटकन उठतो आणि बाहेर जाऊन उभा राहतो. नमस्कार करून आजोबा बाहेर येतात. दोघे घरी येतात. येताना मुलगा पुन्हा त्याच जागेवर उभा राहतो, जिथून त्याचे वडील सायकलवरून निघून जाताना त्यानं पाहिलेले असतात. डोळ्यात एकच आशा असते, उत्कंठा असते… आता तरी आपले बाबा आपल्या घरी परत येतील का? आपल्याला भेटतील का? इथे फिल्म संपते.
अलीकडे बऱ्याच शॉर्ट फिल्म्स पाहिल्यावर असे लक्षात येते की, हिंदी असो की मराठी, बहुतेक सर्व शॉर्ट फिल्म्स अचानक संपतात. त्यांचा रीतसर शेवट दाखवला जात नाही. तो अधांतरी ठेवला जातो. दर्शकांवर सोडला जातो. कधी ते संयुक्तिक वाटते; पण कधीकधी मात्र याची काहीतरी नीटपणे तड लावायला हवी होती; असा गोंधळात टाकणारा शेवट अर्धवट का सोडला असेल, असे वाटून जाते. तसेच हिंदी आणि मराठी शॉर्ट फिल्म्समधला फरक असा जाणवतो की, मराठी शॉर्ट फिल्म्सची नावे मराठीतच असतात. हिंदी फिल्म्सची मात्र बहुतेकदा इंग्रजी नावे असतात. ह्या महिन्यात आपण आस्वाद घेतलेल्या पाचही शॉर्ट फिल्म्स मराठी आहेत.
मायक्रोफिल्म
– माधुरी तळवलकर