मुंबई- गेल्या आठवड्यात पेटीएम या वित्तीय तंत्रज्ञानावर आधारित कंपनीचा शेअर हा शेअर बाजारावर नोंदला होता. त्यावेळी शेअरची किंमत 27 टक्क्यांनी कोसळली होती. नंतर सोमवारीही या कंपनीच्या शेअरचा भाव सकाळच्या सत्रात 18 टक्क्यापर्यंत कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
या कंपनीने गेल्या आठवड्यात आयपीओच्या माध्यमातून 18,300 कोटी रुपयांचे भांडवल जमा केले आहे. आयपीओमधील शेअरच्या किमती या कंपनीच्या कार्यक्षमतेच्या प्रमाणात नाहीत, असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांनी सांगितले की, केवळ एक दिवसाच्या किंवा एखाद्या आठवड्याच्या शेअरच्या भावावरून कंपनीचे मूल्य ठरविता येत नाही. कालांतरानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव स्थिर होईल असे त्यांनी सांगितले.