राजगुरूनगर – संधी येऊनही शरद पवार यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही. त्याचा परिणाम 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोगावा लागला. हा शरद पवारांचा निर्णय चुकला अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली. राजगुरूनगर येथे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित लोकनियुक्त सरपंचसह उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकार्यांची आढावा बैठकीत गारटकर बोलत होते.
गारटकर म्हणाले की, अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाची ताकद राज्यात वाढवायची आहे. दादा मुख्यमंत्री होतील तसे आमदार मोहिते पाटील मंत्री होतील. तसेच कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. राज्यात जे चालले आहे ते राजकारणाचा भाग आहे परत एकत्र येवू अशी भावना आहे. आपण अजित पवार यांच्या मागे आहोत. पुणे शहर मुंबई बरोबर आले आहे. जगात पुण्याचा डंका आहे. प्रचंड वेगाने विकास होत आहे. गरजा वाढल्या त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भावनिक राजकारण न करता जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मंत्रिपदाबाबत खेडवर अन्यायच
मंत्रिपदासाठी सातत्याने खेड तालुक्यावर अन्याय झाला आहे. अजित पवारांबरोबर दिलीप मोहिते कायम ठाम उभे राहिले. मंत्रीपदाची अपेक्षा न ठेवता ते काम करीत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरून लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी आहे.असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी केला.