नागपूर :- केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्ष पाटण्यात आज एकत्र आले आहेत. विरोधी पक्षाला देशाची नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
नागपूरात ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला उंची देण्यासाठी काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटणाला एकत्र येत आहेत. पण ते देशासाठी नाही, तर त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता असल्यामुळे ते एकत्र आले आहेत. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना पुढे करायचे आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना पुढे करायचे असल्यामुळे ते एकत्र आहेत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
बावनकुळे म्हणाले की, भाजप विरोधात आज विरोधक एकत्र आले असले तरी विरोधकांची वज्रमूठ सैल करण्याचे काम देशातील 140 कोटी जनता करेल. विरोधकांनी आज एकत्र येऊन मूठ बांधली असली तरी जनता त्यांना ओळखून आहे.
2014 आणि 2019 मध्ये विरोधकांनी हेच केले, पण काही झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी आता कितीही वज्रमूठ बांधल्या तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वोत्तम नेते, जगातील प्रथम पंतप्रधान आणि जगातील सगळ्यात उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. 2024 मध्ये संपूर्ण एनडीए 400 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवेल. भारतातील एक-एक नागरिक पंतप्रधान मोदी यांना मतदान करेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.