पुणे –राज्य शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा मार्च महिन्यात होत आहे. याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार दि. 7 मार्च रोजी होणारी “अर्धमागधी’ या विषयाची परीक्षा आता दि. 8 मार्च या दिवशी होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा 3 ते 30 मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानुसार या परीक्षांचे वेळापत्रक शाळांनाही पाठविण्यात आले आहे. परंतु, दि.7 मार्च रोजी दुपारच्या सत्रात 3 ते 6.30 या कालावधीत “अर्धमागधी’ या विषयाची परीक्षा आयोजित केली आहे. तथापि, फक्त “अर्धमागधी’ या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल केला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार “अर्धमागधी’ या विषयाची परीक्षा आता दि. 8 मार्च रोजी 3 ते 6.30 या वेळेत होणार आहे. या व्यतिरिक्त बारावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.