पुणे –महापालिकेत नव्याने समाविष्ट 23 गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी कोंडी झाली आहे. ही गावे महापालिकेत आल्यानंतर त्यांना पाणी देण्यासाठी पालिकेकडे आवश्यक वितरण व्यवस्थाच नसल्याने त्यांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. त्याचवेळी ही गावे “पीएमआरडीए’ हद्दीत असताना त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या मोठ्या इमारतींना “पीएमआरडीए’चे पाणी सुरू होईपर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकानेच पाणी पुरविण्याची अट घातली होती. मात्र, ही गावे पालिकेत येताच बांधकाम व्यावसायिकांनीही टॅंकरचे पाणी बंद केल्याने या गावांमधील नागरिकांची कोंडी झाली आहे.
महापालिका हद्दीत सहा महिन्यांपूर्वी 23 नवीन गावे समाविष्ट झाली. 2011च्या जणगननेनुसार या गावांची लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख आहे. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी त्या गावांची जबाबदारी “पीएमआरडीए’कडे होती. त्यामुळे या गावांमध्ये नवीन निवासी बांधकामे तसेच व्यापारी संकूलांना “पीएमआरडीए’ने बांधकाम परवाने दिले आहेत. त्यातील काही बांधकामे पूर्ण झाली असून काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ही परवानगी देताना या निवासी संकूल तसेच व्यापारी संकूलात पाणी पुरविण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर निश्चित केली होती. तसेच, प्राधिकरणाची पाण्याची वितरण व्यवस्था होईपर्यंत व्यावसायिकानेच पाणी देणे बंधनकारक होते. मात्र, त्यानुसार बांधकाम व्यावसायिक पाणी देत होते. मात्र, आता ही गावे पालिकेत येताच अनेक विकसकांकडून नागरिकांना पाणी देणे बंद केले आहे. तसेच आता महापालिका पाणी देणार असे सांगण्यात येत आहे. परिणामी नागरिकांकडून टॅंकरची मागणी होत असून ती पूर्ण करणे शक्य नसल्याने महापालिकेनेही हात वर केले आहेत.
पालिकेचे पीएमआरडीएला साकडे
पाणी देणे शक्य होत नसल्याने महापालिकेकडून पीएमआरडीएला पत्र पाठविण्यात आले आहे. जे बांधकाम व्यावसायिक अटीनुसार, पाणी देत नाहीत त्यांच्यावर कारवाईची मागणी या पत्रात केल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेस वितरण व्यवस्था करेपर्यंत बांधकाम व्यवासायिकांनी अटीनुसार या भागात पाणी देणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी “पीएमआरडीए’सोबत चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.