पुणे – इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, करोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत शाळा सुरू करण्याच विरोध काही पालकांचा विरोध कायम आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनी संस्थाचालक, तज्ज्ञ, पालक, विद्यार्थी, शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत.
दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याने करोना चाचणी करुन घेण्याची सक्ती आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रकही सादर करण्याचे बंधन आहे. सुरक्षा उपाययोजना राबवण्याबाबत आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शाळांना मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास फारसा कोणाचाही उत्साह दिसून येत नसल्याची बाब उघड झाली आहे.
अनेकांची फेसबुकद्वारे संतापजनक प्रतिक्रिया नोंदवून त्या शिक्षणमंत्र्यापर्यंत पोहचवल्या आहेत. त्याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन मते जाणून घेतली आहेत. इतर विविध स्तरावरुनही सूचना, मते मागविण्यात आलेली आहेत.
“सरकारने प्रथमतः मुलांसाठी घरपोच पौष्टिक आहार योजना राबवायला हवी. ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधांचे सक्षमीकरण करावे. लाखो बेरोजगार डीएड व टीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा उपयोग करून तात्पुरती सक्षम प्रत्यक्ष शिक्षणव्यवस्था उभी करावी. सर्व ऑनलाइन शिक्षण फीला तातडीने कमाल मर्यादा जाहीर करावी. शाळा फी सवलतीबाबत इतर राज्यांचे व इतर राज्यातील न्यायालय आदेशाच्या संदर्भाने फी नियमन कायद्यात दुरुस्ती करत अध्यादेश काढावा,’ असे मत पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले आहे.