परभणी – वाढदिवसादिवशीच 20 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील झरी गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. निलेश शिवाजी सत्वधर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो औरंगाबाद इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. एक महिन्यापूर्वी तो गावाकडे परत आला होता. सकाळी शेतात जाऊन येतो असे घरच्यांना सांगून गेला तो परतलाच नाही.
मुलाचा वाढदिवस आहे. तो कुठेच दिसत नसल्याने त्याचे वडिल शिवाजी सत्वधर यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता शेतात लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत निलेशचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेशने लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन वाढदिवसाच्या दिवशीच आपले जीवन संपवले. याप्रकरणी मानवत पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. निलेशने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.