– अरुण गोखले
एका कीर्तनात कीर्तनकार बुवा श्रोत्यांना सांगत होते, बाबांनो! तुम्हाला हे माहीतच असेल की परमार्थात समर्पण भावाची किती गरज असते ते. आता हाच समर्पणाचा भाव आपण घर प्रपंच्यातूनच शिकायचा असतो. तो कसा शिकता येतो ते समजून घ्या. त्याचा अनुभव घ्या आणि त्यातला नेमकेपणा जाणून घ्या.
हेे पाहा! आपली लेक आपल्या घरात जन्मास येते. आपण मोठ्या कौतुकाने तिला लहानाची मोठी करतो. तिला शिक्षण देऊन सुशिक्षित आणि तिच्यावर संस्कार करून सुसंस्कारीत करतो. तिच्या भावी कल्याणासाठी आपण जीवाचं रान करतो. तिला अनुकूल सुयोग्य असा पती निवडतो. चांगलं घरदार पाहून तिचा विवाह करून देतो. तिच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडतात आणि दुसर्याच क्षणी ती कालची तुमच्या घरची पोर त्या नव्या घराची मालकीण होते.
कालपर्यंतच तिचं माहेरचं घर तिला एका क्षणात परकं होत आणि ती परकं असलेलं सासरचं घर आपलं म्हणून त्याचा स्वीकार करते. त्या घरची माणसं तिची होतात. ती त्या घराची वैभवाची एका क्षणात मालकीण होते. ती आनंदाने ते नवं घर हे माझं घर, माझं घर, असं म्हणू लागते. ती ते आपलं मानते. हे कशामुळे तर तिने केलेल्या तिच्या समर्पण भावामुळे. हा समर्पणाचा धडा आपण आपल्याच मुलीकडून शिकायचा असतो.
हेे जसं त्या मुलीने संसारात केलेले असते. तसेच ते जर आपल्याला हव्या असणार्या परमार्थातही करायचे, साधायचे असेल तर त्यासाठी आपल्याही तिच्या सारखंच आपल्या सर्वस्वाचं समर्पण करावं लागतं. संसारात जसं पती पत्नीचं लग्न असतं तसंच परमार्थात जीव आणि शिव याचं मनोमिलन व्हावं लागतं. तिथेही जीवाने जीवाच्या जीव भावाचे पूर्ण समर्पण केले म्हणजेच त्याचेही त्या परमात्म्याशी लग्न लागते.
एकदा का ही समर्पणाची खुबी आपल्याला साधता आली की ती विवाहित मुलगी कशी माहेरची पाहुणी होऊन तिथे येते, राहते आनंद घेते देते, आणि पुन्हा आपल्या स्वत:च्या घरी आनंदाने निघून जाते अगदी तसेच आपल्याही या संसारात पाहुणा होऊन इथे येऊन रमून पुन्हा अलिप्त मनाने स्वत:च्या स्वानंदाच्या घरी म्हणजेच प्रपंच्यातून परमार्थाकडे अगदी सहजतेने जाता येते. त्यासाठी मात्र आपणच आपल्या लेकीकडून ही समर्पणाची कला शिकावी आणि आत्मसात करावी.