बारामती – महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये प्रमुख धनगर समाज आहे. ओबीसींतील भाजप मधील नेत्यांनी ओबीसींच्या प्रश्र्नांबद्दल जसा आवाज उठवला तसाच धनगर आरक्षणाबाबत आवाज उठवावा, केंद्रात भाजपचेच सरकार आहे, कारण धनगर आरक्षण हे केंद्र सरकारच देवू शकते, पंकजाताई आपण धनगर समाजाच्या अरक्षणा बद्दल बोलावे, अडचणीच्या काळामध्ये धनगर समाज आपल्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे इतर समाजाचे आरक्षणाचे प्रश्न मांडत असताना दिल्ली दरबारी धनगर एसटी आरक्षणाचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न आपण केंद्राकडे मांडावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या.
तसेच महाराष्ट्रातील भटक्या जमातींचे नोकरीतील पदोन्नती चे आरक्षण रद्द झाले त्याबद्दल आपली भूमिका नेमकी काय आहे, आपण याविषयी गप्प का? आहेत, आपण ओबिसींचे नेतृत्व करत आहात, परंतु ओबीसींचे आरक्षण रद्द झाले, याविषयी आपण कठोर भूमिका घ्यायला हवी होती. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाचा फुटबॉल केला आहे, असेही अर्चना पाटील म्हणाल्या.
धनगर समाजातील सर्वच पक्षातील प्रमुखांना धनगर आरक्षणा बद्दल बोलण्यात कमीपणा वाटतो की काय? धनगरांचा वापर केवळ सत्ता मिळवण्यात करायचा आणि त्यानंतर सत्तेचा वापर आपल्या आपल्या समाजापुरता करायचा यापुढील काळात धनगर समाजाने विचार करण्याची गरज आहे. धनगर समाजातील नेत्यांनी आपापले हेवे दावे बाजूला ठेऊन धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.