सोलापूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही चैत्री यात्रा प्रतीकात्मक साजरी करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. चैत्र शुद्ध कामदा एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सजावटीसाठी 700 किलो द्राक्षाचा वापर करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळीचे शेतकरी संजय टिकरे या भाविकाने विठ्ठल मंदिर सजावटीसाठी द्राक्षे दिली होती.
भाविकांनी यात्रेसाठी पंढरपुरात येऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच यासाठी मोठा फौजफाटाही येथे तैनात केला होता. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. गर्दी करू नये याविषयी शहरातील मठ, धर्मशाळा आणि लॉजचालकांना सक्त आदेश दिले होते. विठ्ठल मंदिर परिसरातील सर्वच रस्ते बंद करण्यात आल्यामुळे नामदेव पायरी परिसरात शुकशुकाट दिसून आला.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रतीकात्मक स्वरूपात चैत्र वारी साजरी करण्यात आली. वारी काळात शहरात भाविकांनी प्रवेश करू नये, यासाठी पोलिसांनी नऊ ठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच सर्व वाहने तपासून शहरात सोडण्यात येत होती. दिवसा व रात्री एकूण 5 वाहने गस्तीसाठी नेमली होती. ही वाहने शहराबाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून होती. यात्राकाळात विनाकारण बाहेर फिरणारे नागरिक आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
यात्रा म्हंटले की वारकऱ्यांचे पाय सर्वप्रथम वळतात ते चंद्रभागा वाळवंटात येऊन स्नान करूनच भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. मात्र शुक्रवारच्या दिवशीसुद्धा वाळवंटात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे वारकऱ्यांविना वाळवंटात शुकशुकाट दिसून येत होता.
कडेकोट बंदोबस्त…
चैत्री यात्रेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी एक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक 10, पोलीस निरीक्षक चार, पोलीस 100 आणि एक आरसीपी नेमण्यात आला होता. चैत्री यात्रेसाठी भाविकांनी पंढरपूर शहरात प्रवेश करू नये. भविकांसह वारकऱ्यांनी आपापल्या घरात राहूनच यात्रा साजरी करावी. करोनाला अटकाव करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केली आहे.