अदनान सामीच्या पद्मश्रीवर दिग्विजयसिंह यांचा आक्षेप
इंदौर – मूळ पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामी याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्याबद्दल त्याला कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की सामीचे वडिल पाकिस्तानी हवाईदलात कार्यरत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतावर बॉंम्ब टाकले आहेत. त्यांच्या मुलालाच मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.इंदौर मध्ये सीएएच्या विरोधात घटना वाचवा, देश वाचवा या नावाने एक परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी तेथे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सामी हा पाकिस्तानी गायक आहे, त्याला भारतात नागरिकत्व हवे होते. त्याला ते द्यावे अशी सुचना मी स्वताच केली होती. पण त्याला पद्मश्री द्यावी अशी सुचना मी कधीच सरकारला केलेली नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या वडिलांनी भारतावर बॉम्ब टाकले पण त्याचवेळी आसामातील सनाउल्ला या भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने देशाच्या शत्रुशी दोन हात केले पण त्याला मात्र डिटेंशन कॅम्प मध्ये या सरकारने पाठवले आहे. त्याला आसामातील एनआरसी प्रकियेत आपल्या नागरीकत्वाचे पुरेसे पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने मोदी सरकारने विदेशी ठरवून डिटेंशन कॅम्प मध्ये पाठवले आहे हा कुुठला न्याय असा सवालही दिग्विजयसिंह यांनी केला आहे.