नवी दिल्ली – मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधाचे सत्र देशभरात सुरू झाले आहे. त्यातून उद्या (रविवार) गुजरातच्या आदिवासी पट्ट्यात बंद पाळला जाणार आहे. गुजरातमधील बंदसाठी विविध आदिवासी संघटना एकवटल्या आहेत. त्या बंदला कॉंग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.
संबंधित बंद कुठल्या एका संघटनेच्या किंवा राजकीय पक्षाच्या बॅनरखाली होत नसल्याचे आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातच्या पूर्व भागात मोठ्या संख्येने आदिवासींचे वास्तव्य आहे. देशातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) एकूण लोकसंख्येत गुजरातमधील सदस्यांचे प्रमाण 8 टक्के इतके आहे. त्यामुळे गुजरातमधील बंदचे महत्व वाढले आहे.
आदिवासी संघटनांच्या आवाहनावरून बंदला पाठिंबा दिल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. मणिपूरमधील स्थितीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. केंद्रात आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. पण, त्या पक्षाच्या सरकारांना स्थिती नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयश आल्याची टीका विरोधक करत आहेत.