पुणे – जैन धर्मामध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या “उवसग्गहरं स्तोत्रा’च्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम पर्युषण पर्वाच्या पूर्वसंध्येला साध्वी शीलापीजी म.सा. विरायतन बिहार, साध्वी डॉ. कुमुदलताजी म. सा. (आदीठाणा-४) यांच्या प्रमुख व पावन उपस्थितीत तसेच हजारो जैन- अजैन भाविकांच्या उपस्थितीत श्रीमान रसिकलाल धारीवाल स्थानक, यश लॉन्स, बिबेवाडी पुणे येथे संपन्न झाला. आर. एम. डी. फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गेल्या सात वर्षापासून दरवर्षी या स्तोत्र पठणाचे आयोजन करून केवळ जैन धर्माचेच नव्हे तर सर्व भारतीय समाज बांधवांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठीच या स्तोत्राचे आयोजन केले जाते, तसेच या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे दृष्टग्रह, रोगपीडा, शत्रू आदी सांसारिक दुःखपीडा दूर होतात व मनुष्य प्राणीमात्रांमध्ये सुख-समृद्धी प्राप्त होते. याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवल्याचे व आपणही अनुभवा, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांच्या स्वागताच्या वेळी शोभा आर. धारिवाल यांनी केले.
सर्व कष्ट, समस्या यांचे निराकरण तसेच दिव्यशक्तीचा अनुभव भगवान पार्श्वनाथच्या “उवसग्गहरं स्तोत्राचे नियमीत पठण केल्याने होते. या स्तोत्राद्वारे भगवान पार्श्वनाथ यांच्याशी एकरूप व्हावे, असे आवाहन यावेळी साध्वी शीलापीजी म.सा. यांनी केले. तर एवढ्या मोठ्या अनुष्ठानाचे यशस्वी आयोजन शोभाताई यांनी केले याद्वारे त्यांच्यातील नारीशक्तीचे दर्शन होते, असे गौरवोद्धार डॉ. कुमुदलताजी म. सा. यांनी काढले. तर वर्षभर चांगले काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा या स्तोत्राद्वारे प्राप्त होते, अशी भावना जान्हवी धारीवाल बालन यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी पुनीत बालन गृपचे अध्यक्ष पुनीत बालन, आर. एम. डी. स्थानकचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल व सर्व पदाधिकारी, विविध जैन संस्थाचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, शोभाताई आर. धारीवाल वसतिगृह एफ सी रोड, शोभाबेन आर धारीवाल, छात्रालय डेक्कन, व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी, गणेश मंडळ, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन -अजैन बंधू भगिनी उपस्थित होते.