नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे वतीने यावर्षी इ. २ री ते ८ वी च्या मुला-मुलींसाठी सुट्टीत म्हणजेच (दि.१९ ते २९) या कालावधीत व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१९ एप्रिल पासून रोज सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत हे शिबीर होणार असून, तज्ज्ञ प्रा.ज्योती कुलकर्णी या श्लोक व स्तोत्रे, बौद्धीक खेळ, नाटक, कथाकथन व वक्तृत्व, बुद्धि आणि मनाची एकाग्रता, आहार व आणि आरोग्य व व्यायाम, हस्तकला, सुखी जीवनाचा मंत्र इत्यादी सारख्या जीवनात उपयोगी पडणार्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच भूषण देशमुख, शिवाजी नाईकवाडी, अमोल बागुल, महेंद्र कदम, मनिषा कदम, कु.स्वानंदी भारताल, घन:श्याम सानप, साहित्यिक सुभाष सोनवणे, भाऊसाहेब गवळी, सुवेंद्र शिंदे, ठाकूरदास परदेशी, दिवाकर भोयर आदि मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.
लहान वयात आपल्या आवडीच्या कला गुणांना वाव देवून त्यात योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याने लहानपणा पासूनच संस्कारक्षम पाया मजबूत व्हावा, या हेतूने हा उपक्रम वाचनालयाने राबविण्याचे योजले आहे.
या शिबीरात मुलांसाठी गोष्टी, गाणी इत्यादी बरोबर सहजीवनाचे धडे देण्यात येणार आहेत. वाचनालयाच्या वतीने होणार्या या उपक्रमात आपल्या पाल्याला सहभागी करण्यात यावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष अनंत देसाई, दिलीप पांढरे, समिती प्रमुख किरण आगरवाल, शिल्पा रसाळ, वाचनालयाचे सदस्य, निमंत्रित सदस्य, रोटरी ई क्लब ऑफ अपॉवरिंग युथ च्या अध्यक्षा शिलू मक्कर व सचिव आरती म्हात्रे, सदस्यांनी केले आहे.