सोरतापवाडी, (वार्ताहर) – पूर्व हवेलीतील अनेक गावात विजेच्या लपंडावांनी नागरिक त्रस्त झाले असून शेतीला वेळेवर पाणी देणे जिकरीचे झाले असल्याचे मत अनेक शेतकर्यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे वीज बील वसुलीच्या नादात नागरिकांचे जीवन धोकादायक परिस्थितीवर आणून ठेवल्याचे दिसत आहे.
पूर्व हवेलीत अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहे. लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन अशा अनेक गावात लावलेल्या बॉक्सला कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही. दरवाजे उघडे आहेत. अंडरग्राऊंडच्या नावाखाली मोठ्या तारांचा संच अगदी पाच ते सहा फुटांवर लोंबकळत असल्याचे चित्र लोणी काळभोर येथे दिसत आहे. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्याचसोबत दर गुरुवारी महावितरण विभागाकडून दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज नसते. अशावेळी सर्व ट्रान्सफॉर्मर तपासणे, तारा तपासणे, झाडांच्या फांद्या लागून अपघात होऊ नये म्हणून त्या तोडणे आदी कामे करावयाची असतात; परंतु यातील एकही काम होत नसल्याने इतरवेळी अपघात होऊन वीज पुरवठा खंडित होत असतो.
त्याचसोबत अनेक ठिकाणी वाढत्या प्लॉटिंग व्यवसायामुळे महावितरण कर्मचार्यांचे सहकार्य घेऊन ट्रान्सफॉर्मरवर जास्तीचा लोड दिला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा ट्रान्सफॉर्मर खराब होताना पाहण्यास मिळतो. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होताना दिसत आहे.
अखंडितपणे वीज पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्यात पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. सध्या लोणी, फुरसुंगी, उरुळी कांचनव परिसरातील गावांमध्ये लोडशेडिंगची वेळ सोडूनही दिवस-रात्र केव्हाही अचानक जवळजवळ चार ते पाच तास वीज गायब होत असल्याने विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असल्या कारणाने ते देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.