पुणे -करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चपासून बंद असलेले शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील न्यायालये मंगळवारपासून (दि.7) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या व तत्काळ दाव्यांना पुढील तारखा मिळणे थांबणार आहे.
करोनापूर्वी जसे न्यायालयाचे कामकाज चालायचे, तसे आता चालणार आहे. साक्षी पुरावे नोंदविणे, समन्स बजावणे यासह सर्व कामकाजाच्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. यामुळे न्यायासाठी अनेक दिवसांपासून आसुरलेले पक्षकार आणि पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे न्यायालयाचे कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 या एकाच सत्रात सुरू होते. रिमांड, जामीन आणि केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होत असत. करोनाची लाट आता ओसरली आहे. त्यामुळे पुण्यासह 11 जिल्ह्यांतील कामकाज सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
शिवाजीनगरसह जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यासाठी पुणे बार असोसिएशनकडून पाठपुरावा करण्यात आला. सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या असून, न्यायालय सुरू करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली. 97 टक्के वकिलांचे लसीकरण झाले आहे.
त्यापैकी 58 टक्के वकिलांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 37 ते 38 टक्के वकिलांनी एकदा लस घेतल्याचे उच्च न्यायालयात सांगण्यात आले. या मागणीला यश आले आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र, करोना अद्याप गेलेला नाही. वकिलांनी काम करताना करोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.