नवी दिल्ली : झुंडबळींबाबात केलेल्या विधानावर मी अद्याप ठाम आहे. समाजात पसरलेल्या खुल्या द्वेष भावनेमुळे मी अस्वस्थ आहे, असे प्रतिपादन अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी केले.
पोलिसाच्या हत्येपेक्षा अनेक ठिकाणी गो हत्येला अधिक महत्व दिले जाते, असे विधान या 69 वर्षीय अभिनेत्याने गेल्यावर्षी केले होते. शहा यांच्याशी अभिनेते आनंद तिवारी यांनी इंडिया फिल्म प्रोजेक्टमध्ये संवाद साधला. त्यावेळी त्यांना आपल्या राजकीय आणि सामाजिक मतांचा चित्रपटसृष्टीतील संबंधावर परिणाम होतो का? असा प्रश्न विचारला होता. त्याला शहा उत्तर देत होते.
ते म्हणाले, चित्रपट उद्योग आणि त्यातील मान्यवरांशी माझे फार घट्ट नाते कधीच नव्हते. त्यामुळे माझ्या मतांचा त्यावर परिणाम होतो की नाही याची मला कल्पना नाही. मी काही सदोदीत व्यस्त असणारा अभिनेता नाही. पण, मला जे वाटते ते मी बोलतो आणि त्यावर ठाम राहतो. ज्यांच्याकडे चांगले काही करण्यासारखे नाही अशा लोकांकडून मी खूप शिवीगाळ सहन केली आहे. पण, त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही.
अलीकडेच 49 बुध्दीवाद्यांवर दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याचा शहा यांच्यासह छायाचित्रणकार आनंद प्रधान, इतिहासकार रोमीला थापर आणि हर्ष मंदेर यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील 180 जणांनी निषेध केला होता.