तीर्थक्षेत्र आळंदी – सोमवारी (दि. 13 मे) मुंबईतील घाटकोपरमध्ये मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची कारवाई सुरु आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मंगळवारी (दि. 14 मे) नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश निर्गमित केले असून आळंदी शहर आता अनधिकृत होर्डिंग आणि त्यापासून होणाऱ्या विद्रुपीकरणापासून मुक्त होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.
29 जूनला श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक तीर्थक्षेत्र आळंदीला येतात, तसेच पुढे लगेच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगमुळे भाविक तसेच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, किंवा कोणती संभ्याव्य अप्रिय घटना घडू नये यासाठी शहरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरु झाली आहे.
तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील – मुख्याधिकारी
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले की, मुंबई येथील होर्डिंग्ज दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि नजिकचा पावसाळा विचारत घेता आळंदी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ निष्कासित करण्याचे व याकामी येणारा खर्च होर्डिंग्ज उभारणारे तसेच ज्यांच्या खाजगी जागेत होर्डिंग्ज असतील त्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता करातून वसूल करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास दिनांक 14 मे रोजी निर्गमित केले आहेत. सदर आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने नोटिसा बजावून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
आळंदी नगरपरिषद कार्यालयामार्फत परवानगी घेवुन उभारण्यात आलेल्या होर्डिंग्ज धारकांना देखील नोटिसा बजावून 15 दिवसाच्या आत रचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल सादर करण्याच्या व असा अहवाल विहित मुदतीत सादर न करणाऱ्या होर्डिंग्ज तत्काळ निष्कासित करणे बाबत अतिक्रमण निर्मूलन विभागास सूचना केल्या आहेत. आळंदी नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर येथील 3 व चाकण चौक येथील 1 अश्या 4 होर्डिंग्ज देखील काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आळंदी नगरपरिषद अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केले बाबत कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंतच्या काळात एखादी होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंग्ज धारक तसेच ज्यांच्या खाजगी जागेत अशी होर्डिंग्ज असेल ते जागा मालकावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिला आहे.