कराड – करोना पाठोपाठ ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिंयंटच्या शिरकाव्याने सर्वत्र चिंता वाढली असल्याने जिल्हा व स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेत सरकारी कार्यालयात लस न घेणार्यांना प्रवेश नाकारला होता.
मात्र काही दिवसातच या सर्व ठिकाणी नियमांना हरताळ फासली गेली आहे. नागरिक बिनधास्त कार्यालयात ये जा करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेटवर, दरवाज्यात कर्मचारी तैनात केला आहे मात्र तो त्याच्या मोबाईल मध्ये गूंग असल्याने प्रवेश करणार्याला कोणी ही विचारत नसल्याने अनेक जण बिनधास्त जात आहेत.
शहरातील नगरपालिका कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत, तहसीलदार कचेरी, पंचायत समिती या ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानुसार प्रशासनाने याबाबत प्रवेशद्वारावरच सूचना लावली होती.
लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात होता. पण आता याच ठिकाणी आता स्थिती बदलली असुन विना मास्क नागरिक बिनधास्त कार्यालयात प्रवेश करीत आहेत.स्थानिक प्रशासनाला पंधरा दिवसातच स्वता लावलेल्या नियमांचा विसर पडला असल्याने शासकीय कार्यालयात आओ जाओ घर तूम्हारा अशी स्थिती सध्या दिसत आहे.
सातारा जिल्हा प्रशासनाने सध्या वाढत असलेल्या करोना व ओमायक्रोनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर, प्रवाशांवर, विक्रेते, दूकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, मात्र प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. विना मास्क फिरणारे, ठिकठिकाणी गर्दी करणारे, जमावबंदीचे उल्लंगन करणारे, पोलिस प्रशासनाला दिसत नसल्याचे जाणवत आहे.