श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरासह तालुक्यात काल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार लहू कानडे यांनी आज बेलापूर खुर्द येथील नुकसानग्रस्त केळी बागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईबाबतच्या सूचना केल्या.
काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळाने शहरातील होर्डिंग तसेच झाडे पडली, विजेचे खांब पडले. तालुक्यात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वादळ झाले. वादळाने झाडे उन्मळून पडली तसेच काही ठिकाणी विजेचे खांब पडले. वादळी पावसाने अनेक ठिकाणी केळी, द्राक्षबागा तसेच कैऱ्यांसह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आ. कानडे यांच्याकडे केली होती.
आ. कानडे यांनी आज सकाळी बेलापूर खुर्द येथील हरिश्चंद्र पुजारी यांच्या नुकसानग्रस्त केळीच्या बागेस भेट दिली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, वसंतराव शिंदे, कामगार तलाठी शिंदे, कृषी सहाय्यक तृप्ती तनपुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी दीड एकरातील केळी झाडे उन्मळून पडली. काढणीस आलेले केळीचे घड जमिनीवर आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पुजारी यांनीकेली. आ. कानडे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.