शिक्रापूर- हॅलो मी बॅंकेतून बोलतोय, तुमचे एटीएम बंद झाले आहे, तुम्हाला बॅंकेकडून बक्षीस मिळाले आहे, तुमच्या मोबाइलवर येणारा मेसेजमधीन पिन नंबर सांगा आणि अचानक बॅंक खात्यातील पैसे गायब होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे, असे प्रकार रोखण्याचे आव्हान सायबर सेलसमोर आहे.
नागरिकांना अनेकदा फोन करून बॅंकेची माहिती देऊन तुम्हाला लकी ड्रॉ मिळाला आहे, तुम्हाला बोनस मिळाला आहे, तुमचा मोबाइल नंबर लकी नंबरमध्ये निवडला गेला, तुम्हाला चारचाकी गाडी लागली आहे, तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे, त्यासाठी तुम्ही काही रक्कम तातडीने भरा अशा पद्धतीने फोन करून नागरिकांना काही नंबर विचारून नागरिकांचा विश्वास संपादित करून नागरिकांच्या बॅंक खात्यातील पैसे गायब होण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागामध्ये फोन करून माहिती विचारण्याचे तसेच लकी ड्रॉच्या नावाखाली काही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यांच्या आधारकार्ड, मतदान कार्ड, बॅंक खाते, मेल आईडी घेऊन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहे.
- गंडा घालण्याच्या प्रकारांत वाढ
जगातील वाढते तंत्रज्ञान जितके फायद्याचे तितकेच तोट्याचे असून शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये देखील असंख्य नागरिक या तंत्रज्ञानाचे बळी ठरत आहेत. ऑनलाइनद्वारे गंडा घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाले. - ग्राहकाला बनावट प्रमाणपत्र
शिक्रापूर येथील एका ग्राहकाला तुम्हाला लकी ड्रॉ मिळाला आहे, तुम्ही आमचे लकी ग्राहक ठरलेले आहात असे बोलून त्यांच्या मोबाइलवर ग्राहकाचे नाव, फोटोसह एक बनावट शिक्का मारून बनावट तब्बल पंचवीस लाख रुपयांचे लकी ड्रॉ प्रमाणपत्र पाठविण्यात आले, पण ग्राहकाने जागरूकता दाखवून अनेक मित्रांना त्याबाबत माहिती दिली आणि समोरील व्यक्तीने दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे भरणे टाळले त्यामुळे सदर युवक फसवणुकीतून बचावला गेला आहे. - पोलिसांकडून जनजागृती
ग्रामीण भागामध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या प्रकारांना आळा बसावा शिक्रापूर पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी जनजागृती फलक लावले आहेत. तसेच परिसरात सोशल मीडियाद्वारे देखील जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. - ग्रामीण भागामध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 21 अन्वये खोट्या व भ्रामक जाहिरातीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. वारंवार अशा जाहिराती देऊन फसवूक करणाऱ्यावर पन्नास लाखांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकाला फसवणूक झाल्यापासून कोणत्याही जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते.
-रमेश टाकळकर, ग्राहक पंचायत, जिल्हाध्यक्ष