मुंबई: दिल्लीत चार दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. सीएए आणि एनसीआर’ला मोठ्या प्रमाणात विरोध दिसत असून लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विरोधकांनी हे देशाचे गृहमंत्री आणि केंद्र सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी माननीय प्रधानमंत्र्यांना नम्र विनंती करते की हा विषय सत्तेत असण्याचा किंवा विरोधकांचा नाही, हा प्रश्न माझ्या भारताचा आहे. भारतात एवढा महत्त्वाचा माणूस आलेला असताना अशी गोष्ट घडतेच कशी? पंतप्रधानांच्या ऑफिसने पूर्णपणे व पारदर्शकपणे त्याची चौकशी केलीच पाहिजे. या देशाचे गृहमंत्री नक्की करतात तरी काय? हे पूर्णपणे गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारचे अपयश आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. ही एवढी मोठी घटना अतिशय दुर्दैवी आणि भारताला काळिमा फासणारी आहे.
केंद्रातल्या सरकारचा जो इंटेलिजन्स विभाग काय करतोय हा प्रश्न पडतोय. प्रेसिडेंट ट्रम्प यांचा एवढा मोठा दौरा चालू असताना दिल्लीमध्ये टाचणी सुद्धा पडता कामा नये, असे सुळे म्हणाल्या.