पिंपरी – पेटीएम केवायसीच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यात याबाबत 18 तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात हाणामारी आणि चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोख खरेदी ऐवजी नागरिक ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा सायबर चोरटे घेताना दिसत आहेत. पेटीएम केवायसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत आहे. सायबर विभागाकडे मार्च महिन्यात याबाबतच्या 18 तक्रारी आल्या आहेत. तर एप्रिल महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सहा तक्रारी आल्या आहेत.
अशी आहे फसवणूकीची पद्धत
सायबर चोरटे मेसेज पाठवून केवायसी न केल्यामुळे आपले पेटीएम खाते बंद करणार असल्याचे सांगतात. जर खाते सुरू ठेवायचे असेल तर पुढील लिंकवर माहिती पाठविण्याचे आवाहन करतात. या भूलथापांना नागरिक बळी पडतात. आपल्या पेटीएम खात्यासह आलेला ओटीपी क्रमांकही चोरट्यांना देतात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपल्या खात्यातील रक्कम चोरीला जाते.
सायबर शाखेचे आवाहन
“”पेटीएमचे केवायसी करण्याची आवश्यकता नसते. आपल्याला आलेली कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका. कोणतीही बॅंक एटीएम किंवा आपल्या खात्याबाबत फोनवरून माहिती विचारत नाही. जर खूपच आवश्यकता असेल तर बॅंकेच्या शाखेत जाऊन आलेल्या मेसेजची खात्री करा.”
सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-सायबर विभाग