पुणे – मार्केट यार्डात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात 50 रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्याच्या भाववाढीला आता चाप बसणार आहे.
पावसाने उघडीप दिल्याने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातून ही आवक सुरू झाली आहे.
महिनाभरापूर्वी महाराष्ट्र तसेच कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम तर लांबणीवर पडला.
मुसळधार पावसामुळे शेतात नवीन कांद्याची रोपे वाहून गेली होती. त्यामुळे साठवणुकीतील जुन्या कांद्याला मागणी येऊन घाऊक, किरकोळ बाजारात भावात वाढ झाली होती. दरम्यान, केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीस बंदी घातली.
यामुळे जुन्या कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, मागणी वाढल्याने भाव तेजीत होते, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.