जानेवारी-फेब्रुवारीत आवक घटली
पुणे – देशभरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून विविध हंगामातील एकूण कांदा लागवडीत यंदा 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारीत बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याची आवक मात्र घटली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशभरात खरीप, लेट खरीप आणि रब्बी या हंगामांमध्ये एकूण 13 लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. त्यात एकट्या रब्बी हंगामाचा 6.5 लाख हेक्टर वाटा आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 41 टक्के लागवड पूर्ण झाली आहे. तर अजून 15 फेब्रुवारीपर्यंत लागवड सुरू राहणार आहे.
जानेवारी, फेब्रुवारीत बाजारात येणाऱ्या कांद्याचा समावेश लेट खरीप हंगामात केला जातो. 2018 मधील खरीप हंगामात 48 लाख टन, तर लेट खरिपात 21 लाख टन असे एकूण 69 लाख टन कांदा उत्पादन झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपात 39 लाख टन, तर लेट खरिपात 15 लाख टन असे एकूण 54 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामध्ये यंदा 21 टक्क्यांची घट झाली आहे. या हंगामात 98 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. यंदाच्या तुलनेत एकून 19 टक्क्यांची घट झाली आहे.
यंदा कांद्याची उच्चांकी उसळी लक्षात घेता, बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे. मात्र, आतापासूनच विविध बाजारपेठांमधील कांद्याचे भाव हळुहळू कमी होत आहेत. तर, चांगल्या दराच्या अपेक्षेने लागवड केलेल्या कांद्याची आवक मार्चपासून सुरू होणार आहे. त्यावेळी अचानक वाढलेली आवक पाहता कांद्याचे भाव आणख कमी होण्याची शक्यता आहे.