पुणे – कांद्याला मागणी वाढलेली असताना आवक कमी होत आहे. आता, चार दिवसांत शहरातील हॉटेल्स, खानावळी सुरू होतील. यातून मागणी वाढणार असल्याने कांदा 50 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परिणामी, किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव 60 ते 65 रुपयापर्यंत वाढू शकतील. यामुळे आठवड्याभरात कांदा पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, संगमनेर तर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मंचर, शिरूर आणि आंबेगाव या भागातून मार्केटयार्डात मंगळवारी जुन्या कांद्याची सुमारे 40 ट्रकची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या 10 किलो कांद्याला 380 ते 420 रुपये
भाव मिळाला. तर मध्यम प्रतीच्या कांद्याला 320 ते 370 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात किलोचा भाव 50 रुपये आहे. मात्र, वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव वाढतील.
बाजारात केवळ 20 टक्केच चांगल्या प्रतीच्या मालाची आवक होत आहे.
पोमण म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, अतिवृष्टीमुळे दोन्ही राज्यातील नवीन कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगाम लांबला आहे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांद्याची आवक सुरू होईल. मात्र, नवीन कांद्याला पावसाचा मार बसल्याने दर्जा खालावलेला असणार आहे. त्यामुळे आणखी सुमारे दीड महिना जुन्या कांद्याचे दर अधिक असणार आहेत.a