सातारा – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात फक्त एक रुपयात आरओचे एक लिटर शुद्ध पाणी देण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन गेली 12 वर्षे क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात रोज दुपारी 12 वाजता 70 ते 80 रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नसेवा देत आहेत. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे फाउंडेशनने एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी एटीएमद्वारे मिळण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. माहेश्वरी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.
जलसेवा योजनेचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, डॉ. संजोग कदम, डॉ. सुहास माने, सुरेखा चव्हाण, व्यंकटेश गौड, डॉ. सुरेश पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष हरिनारायण कासट, जलसेवा प्रकल्पप्रमुख विनोद राठी, खजिनदार उज्ज्वल सारडा, सचिव दिलीप लोया, उद्योजक जुगलकिशोर, संचालक राधेश्याम भंडारी, जितेंद्र भंडारी, सागर कलाणी, प्रकाश मंडोरे, नरेंद्र मिणीयार, प्रमोद लाहोटी, रवींद्र जाजू, श्रीनिवास कासट, नीलेश लाहोटी, भरत वैष्णव, दिलीप शहा, सौ. साधना लाहोटी, माधव सारडा, आनंद मालपाणी, मुकुंद लाहोटी, विजयेंद्र राठी, राजेंद्र कासट, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हरिनारायण कासट, विनोद राठी यांनी स्वागत केले. सुदीप भट्टड यांनी आभार मानले.