नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथे गुरुवार (दि. २९) रोजी दुपारी कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पांढरीपुल येथील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, इमामपूर घाट उतरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने ( क्र. एम. एच. १४ के. ए. ३६५१) दुचाकीस धडक दिल्याने अपघात घडला. कंटेनरने सुमारे पाचशे फूट अंतरापर्यंत दुचाकी फरपटत नेली. त्यामध्ये इस्माईल अल्लाबक्ष शेख ( रा. मजले चिंचोली ता. नगर ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नवनाथ भाऊसाहेब बोरुडे व दादासाहेब मारुती सरक ( दोघे रा. खोसपुरी ता. नगर ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात स्थळी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, अमोल सुद्रिक, जोडमोहजचे माजी सरपंच पिंटू खाडे, शेखर खंडागळे, शिवराज काळे, अतुल भवार यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. सोनई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
पांढरी पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील दिले होते.
परंतु काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. पांढरीपुल परिसरातील अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ उपायोजना करण्याची मागणी आदिनाथ काळे, खोसपुरी माजी सरपंच सोमनाथ हारेर, वांजोळीचे बद्रीनाथ खंडागळे, सरपंच अविनाश आव्हाड, बाबा शेख, संतोष बोरुडे, दादासाहेब बडे, अमोल पवार, महादेव औटी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.