Success Story : बिहारमधील बहुतेक कुटुंबांची गोष्ट अशी आहे की जेव्हा घरातील मोठ्या किंवा लहान मुलाला त्याच्या जबाबदाऱ्या कळतात, तेव्हा तो घरच्या गरजा भागवण्यासाठी स्थलांतरित होतो. यानुसार लोक मोठ्या शहरांमध्ये आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातसह अशा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करतात. हा ट्रेंड आजही कायम आहे. ब्रिजकिशोर मेहता यांनीही असेच काहीसे केले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी ते हरियाणातील हिस्सार येथे रोजगाराच्या निमित्ताने उदरनिर्वाहासाठी गेले होते.याठिकाणी जाऊन त्यांनी सुरुवातीला मजुरीचे कामे सुरु केले.पण ते फार काळ काम करू शकले नाही. तेथूनच त्यांनी एका परदेशी फळाची लागवड शिकली. ज्यामुळे ते श्रीमंत झाले. आज त्याची कमाई सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक आहे. हे फळ दुसरे तिसरे कोणतेही नसून स्ट्रॉबेरी आहे. ब्रिजकिशोर हे मूळचे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
सुरुवातीला मजुरी करताना मेहनत काय असते आणि त्याची किंमत किती आहे याची प्रचीती ब्रिजकिशोर यांना आली. म्हणूनच इतरांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीकडे लक्ष देण्याचे त्यांनी ठरवले. आज शेतीच्या माध्यमातून ते अनेक स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत आहेत.
बिहारमध्ये गेल्या दहा वर्षात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. एकेकाळी आपल्या जमिनीत भात, गहू आणि इतर पिके घेऊन आपल्या घरच्या मूलभूत गरजा भागवता न येणारा ब्रिजकिशोर आज स्ट्रॉबेरीच्या शेतीला चांगले उत्पन्न मिळवण्यासाठीचा उत्तम पर्याय मानतात.
हरियाणातून ६० रोपे आणून सुरू केली शेती
आज डोंगराच्या कुशीत वसलेल्या चिलखी बिघा या ब्रिजकिशोर यांच्या गावात चाळीस शेतकरी स्ट्रॉबेरीच्या लागवडीत गुंतलेले आहेत. पण त्यांनी पहिल्यांदा हरियाणातून रोपे आणली तेव्हा त्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. शेतकऱ्याशी संवाद साधताना ब्रिजकिशोर सांगतात की, गावात फक्त ६० रोपे घेऊन आलो आणि शेती करायला सुरुवात केली. आज ते 10 एकरात स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. ते एका वर्षात सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या स्ट्रॉबेरीची विक्री करतात. ते सांगतात की 10 एकर शेतीसाठी 70 लाख रुपये खर्च येतो. अशा प्रकारे स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून त्यांना वर्षभरात 70 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांनाही भुरळ
राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ब्रिजकिशोर मेहता यांच्या शेतावर आले आहेत. तेव्हा ब्रिज किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश यांना राज्यात पॅक हाऊस आणि स्ट्रॉबेरी प्लांट्स उपलब्ध नसल्याबद्दल सांगितले होते. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. ते म्हणतात की त्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी बिहारसह इतर राज्यांमध्ये जातात, त्यापैकी सुमारे 70 टक्के माल फक्त कोलकातामध्ये निर्यात केला जातो. एकेकाळी हरियाणात नोकरीसाठी गेलेल्या ब्रिजकिशोर यांच्या हाताखाली आज सुमारे दोनशे लोक काम करत आहेत.