नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख चांगलाच खाली गेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात असतानाच पुन्हा एकदा चिंता निर्माण करणारी बातमी समोर येत आहे. आशिया आणि युरोपमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा करोनाचे सावट घोंगावत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावध भूमिका घेत सर्व राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
वाढत्या करोनाच्या रुग्णसंख्येमुळे मोदी सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला आहे. तसेच आपल्या सुरक्षेमध्ये कोणतीही कमी करू नका असे सांगत सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसेच आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्यासोबतच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोनाच्या नियमांचे पालन केले जाव अशी सूचना केंद्राने केली आहे.
केंद्राने राज्यांना कोणत्याही स्थितीत नियमांचे पालन करण्यास सांगितले असून सामाजिक तसेच आर्थिक गोष्टी सुरळीत सुरु रहाव्यात यासाठीही लक्ष देण्यास सांगितले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन करोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल असे सांगितले आहे. तसेच लोकांनी लसीकरण करावे यासाठी प्रयत्न करण्यासही सांगितले आहे.
“दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर १६ मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले,” असे भूषण यांनी पत्रात सांगितले आहे. करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असे आवाहन केले आहे.
करोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी राजेश भूषण यांनी राज्यं आणि केंदशासित प्रदेशांना जास्तीत जास्त नमुने INSACOG नेटवर्ककडे द्यावेत असं आवाहन केलं आहे. जर नवीन व्हेरियंटची वेळेत माहिती मिळाली तर त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल असं भूषण म्हणाले आहेत. पत्रात पुढे ते म्हणालेत की, राज्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची आठवण करुन दिली पाहिजे.