आमचे गाव कार्यशाळेत अकरा गावांचा समावेश : तरूणांनीही फिरविली पाठ
पळसदेव – येथील ग्रामपंचायतीमध्ये “आमचे गाव आमचा विकास 2020-2021 अंतर्गत कार्यशाळेस पंचायत समिती गणातील अनेक गावकारभारी आणि पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे गावविकासाचा गाडा हाकण्यासाठी प्रशासनातील महत्त्वाचा दुवा समजले जाणारे अधिकारीच गैरहजर राहत असल्यामुळे कार्यशाळेच्या व्यापक विकासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ग्रामस्थ आणि युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला.
राज्य सरकारने केलेल्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीला स्वतःचा निधी स्वतःच वापरावा, यासाठी 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्याचा कार्यकाळ संपत आला आहे. 2020 ते 2025 पंचवार्षिक कालावधीसाठी एक जानेवारीपासून 15 वित्त आयोग सुरू होणार आहे. गावातील व वाड्या वस्त्यावरील समस्याच समजून नियोजन व खर्च कशाप्रकारे करायचा आहे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यशाळेत पळसदेव पंचायत समिती गणातील 11 गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक, विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरपंच अश्विनी काळे, माजी उपसरपंच संतोष काळे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम काळे, मेघराज कुचेकर, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब भुजबळ, वैद्यकीय अधिकारी मिलीन यादव, पोलीस पाटील आप्पा बांडे, सुनील काळे, विविध गावातील सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्यसेविका उपस्थित होते.
इंदापूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप म्हणाले की, 14 वा वित्त आयोगाचा अनुभव व पेंडिंग कामे पूर्ण करून घेण्याबरोबरच 15व्या वित्त आयोगाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अंगणवाडी शाळा, आरोग्य अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापकांकडून कच्चा आराखडा तयार करून (प्रारूप आराखड) तयार करून तो पंचायत समितीकडे पाठवला जाईल. त्यानंतर ग्रामसभेची मान्यता घेऊन अंतिम आराखडा मंजूर झाल्यानंतर तो पुढे पाठवला जाणार आहे. यामध्ये वंचित घटकांची सभा आणि बाल आनंद मेळावा या दोन सभा घेणे ग्रामपंचायतीला बंधनकारक करण्यात आले आहे.