नुकताच जगद्विख्यात टेनिस खेळाडू रॉजर फेडरर निवृत्त झाला. त्यानं याबाबत एक पत्रक प्रसारित केलं. त्यात तो म्हणतो की, मी आता 41 वर्षांचा झालो आहे. दुखापती आणि विविध शस्त्रक्रिया यांना मी सामोरा गेलो आहे. माझ्या या वयातील माझ्या शारीरिक मर्यादांची मला जाणीव आहे.
फेडररसारख्या टेनिसच्या अनभिषिक्त सम्राटालाही शारीरिक मर्यादा आल्या. आपणा सर्वांनाही विविध प्रकारच्या मर्यादा आहेत. प्रश्न असतो तो फक्त त्या उमजून सुसंगत अशा जीवनव्यापाराचा. सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटपटूला कुणीतरी त्याच्या शारीरिक उंचीची जाणीव करून दिली. त्याविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचे सर्वश्रेष्ठ फलंदाज डॉन ब्रॅडमन त्याला म्हणाले, हे बघ, जगातील सर्वोत्तम उंच आणि तगड्या गोलंदाजांना आपल्यासारख्या उंची कमी असलेल्या फलंदाजांनीच धोपटून काढलं आहे! ब्रॅडमन यांची स्वत:ची उंचीही फार नव्हती. हे खरं असलं तरी आपल्याला मर्यादांचं भान ठेवावंच लागतं. दुसरे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी खूप उंची दिलेले चेंडू सोडून देणंच पत्करलं कारण त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव होती.
आयुष्यात पदोपदी मर्यादा पाळाव्या लागतात. ज्येष्ठ व्यक्तीचा कितीही संताप आला तरी मर्यादांचं भान ठेवून शांतपणे आणि वेगळ्या मार्गानं तो व्यक्त करावा लागतो. काही शिष्टाचार असतात त्यांच्या मर्यादेतच आपल्याला आपलं वागणं ठेवावं लागतं. प्रभू रामचंद्रांना मर्यादापुरुषोत्तम म्हटलं जातं कारण समाजानं घालून दिलेल्या मर्यादांचं ते कठीण परिस्थितीतही पालन करीत असत. लक्ष्मणानं मात्र श्रीरामानं घालून दिलेली मर्यादा उल्लंघल्यामुळे काय अनर्थ ओढवला हे आपल्याला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सेनेच्या मर्यादा माहीत होत्या तरीही त्यांनी गनिमी काव्यासारख्या तंत्राचा वापर करून महाबलाढ्य मोगल सेनेला जेरीला आणलं.
आपलं आयुष्य सीमित आहे. ही आयुर्मर्यादा ध्यानात ठेवून वेळच्यावेळी आवश्यक त्या कृती केल्यास प्राप्त जीवन समाधानकारक होतं. योग्य वेळी पाल्यांचं शिक्षण आणि इतर तरतुदी तसंच आयुष्याच्या संध्यासमयी इच्छापत्र करून ठेवणं ही आयुर्मर्यादेचा मान ठेवून केलेली कामं आहेत. ज्ञानमर्यादा उघड केली नाही, तर काहीच शिकता येणार नाही. गुरूपुढे बसून फुशारक्या मारल्या तर गुरू शिष्याचा स्वीकारच करणार नाही. मला या बाबतीत पूर्ण अज्ञान आहे, असं म्हटलं तरच त्या शास्त्रातील ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानतृष्णा असलेल्यांनी ज्ञान हे अमर्याद आहे असं समजूनच शक्य तेवढं आत्मसात केलं पाहिजे.
प्राचीन काळी जगाची मर्यादा आपल्याला दिसेल त्या क्षितिजापर्यंत समजली जात होती. नंतर मानव लांबवरचा प्रवास करू लागल्यानं त्याच्या मर्यादा लांबवर पोचल्या. आता माणूस अवकाशाला गवसणी घालत आहे त्यामुळे त्याच्या विश्वाच्या संकल्पनेची मर्यादा खूप दूरवर पसरली आहे. ज्ञानमर्यादेबाबत असंच गृहीत धरायला हवं म्हणजे ज्ञानाचा अखंडितपणे पाठपुरावा करता येईल. मात्र उपलब्ध ज्ञानाला मर्यादा आहेत असं वाटतं, कारण विज्ञानानं मोठी प्रगती केली तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर नवीन अधिक अवघड प्रश्न उभे राहतात. मर्यादा सोडून नीतिनियमांचं उल्लंघन करणं हे आजकाल नित्याचं झालं आहे. कोणताही मुलाहिजा न ठेवता समाजमाध्यमांतून “ट्रोलिंग’ करीत राहणं हा तर अनेकांचा व्यवसायच झाला आहे. सामान्यांची ही कथा तर त्यांचे नेते असलेले कसे मागे राहतील? मिळेल त्या माध्यमामधून विरोधकांची उणीदुणी काढणं, त्यांना अशोभनीय भाषेत शिवीगाळ करणं हे तर चालूच आहे परंतु हाच प्रकार त्यांच्या दिशेनं आला तर कोर्टात खेचण्याची भाषा सुरू होते.
बहुतेकांनी “अमुक अमुक संस्था मर्यादित’ अशा पाट्या वाचल्या असतील. इथे “मर्यादित’ म्हणजे ज्याला इंग्रजीत “लिमिटेड लायबिलिटी’ असं म्हणतात त्याचा अर्थ मर्यादित दायित्व असा आहे. म्हणजे गुंतवलेल्या रकमेची मर्यादित जबाबदारी ती कंपनी घेत असते. ही झाली आपण होऊन घातलेली मर्यादा. एकूण आपल्या वर्तणुकीत जिथे दुसऱ्याला वेदना होऊ शकतात, समाजाला किंवा राष्ट्राला हानी पोचू शकते तिथे आपण मर्यादा घातली पाहिजे. मात्र ज्ञान, कर्तव्य, सेवा अशा क्षेत्रात मर्यादा न घालणं हेच उचित.
मलाही आता थांबलं पाहिजे- कारण माझ्या लेखालाही शब्दमर्यादा आहे!
– श्रीनिवास शारंगपाणी