पाण्यातून सपासप वल्हवत तो होडी पुढे नेत होता. सूर्यास्ताच्या आधी त्याला सोनेरी मासा पकडून परत घरी पोचायची घाई होती. पाण्यात मारलेल्या वल्ह्याचा आवाज आणि मध्येच एखाद्या समुद्री पक्ष्याची चिरीप एवढाच काय तो आवाज येत होता. होडी वेगाने पुढे सरकत होती…
सुर्यास्ताला आता शेवटचा तासभर उरला होता. अजून त्याचं काम काही फत्ते झालं नव्हतं. तीन तास वेगाने वल्हवल्यामुळे त्याचे दंड भरून आले होते. त्यात चार-पाच वेळा तरी त्याने माशांचं जाळं ताकदीने ओढलं होतं. कधी सहज न मिळणारे मासे त्याच्या जाळ्यात आज येत होते. पण त्याला पाहिजे तो मासा मात्र काही केल्या जाळ्यात येत नव्हता. तोच मासा पाहिजे म्हणून तो हट्टाला पेटला होता. कारण त्याची आज प्रचंड गरज होती.
जाळ्यातून सगळे मासे सोडवून त्याने परत नव्या आशेने जाळं पाण्यात फेकलं. यावेळी तरी नक्कीच तो सोनेरी मासा जाळ्यात येईल, अशी त्याची अपेक्षा होती. त्या भागात या माशाला सोनेरी मासा असंच म्हणायचे, कारण त्या माशाच्या अंगावरचे खवले पिवळसर रंगाचे असायचे आणि त्यावर प्रकाश पडला की ते सोन्यासारखे चमकायचे. हा सोनेरी मासा तुझ्या जाळ्यात सापडला तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल, असं त्याला एका ज्योतिषाने सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा हा खटाटोप चालला होता. त्या ज्योतिषाने त्याला हा सल्ला देण्याची ही तिसरी वेळ होती.मागे दोनदा त्याने प्रयत्न केला खरा, पण तो सोनेरी मासा काही त्याच्या जाळ्यात सापडला नाही.
आपली गरिबी कशी दूर होईल आणि घरात सुख कधी नांदेल, असा प्रश्न त्याने त्याच्या गावातल्या ज्योतिषाला विचारला होता. हा ज्योतिषी खूप प्रसिद्ध होता. दूरदूरच्या गावांतून त्याच्याकडे लोक यायचे. त्याला ज्योतिषाचं मोठं ज्ञान होतं, असं लोक म्हणायचे. पण त्याने सांगितलेलं आजवर कधीही खोटं झालेलं नव्हतं. त्याला पुढं घडणाऱ्या घटना आधी समजायच्या. त्याचं कारण त्याच्याकडे आध्यात्मिक शक्ती होती, असं लोक सांगायचे. त्याने सांगितलेलं खरं होण्यामागे त्याचा ज्योतिषाचा अभ्यास होता की त्याच्याकडं असलेली आध्यात्मिक शक्ती हे माहीत नाही, पण त्याच्या तोंडातून आलेला शब्द खरा ठरायचा. वाचासिद्धी म्हणतात तसा.
तर पहिल्यांदा हा त्याच्याकडे गरिबी आणि सुखाबद्दल विचारायला गेला तेव्हा त्याने त्याला तो सोनेरी मासा आणायला सांगितला. एक-दोनदा त्याने गावातल्या मासळी बाजारात तो मासा बघितला होता. पण त्याच्या जाळ्यात तो कधी सापडला नव्हता. तो ही कोळ्याचाच पोर. मासेमारी हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. लहानपणापासून तो बोटीवर जायचा. त्याच्या आजोबा आणि वडिलांसोबत तर तो अनेकदा गेला होता. तेव्हापासून त्याचं दर्या, दर्यावरचे पक्षी आणि पाण्यातले मासे यांच्याशी नातं जोडलं गेलं होतं. त्याने अनेक प्रकारचे मासे बघितले होते, जाळ्यात पकडले होते आणि मासे हा तर त्याचा आवडीचा आहार. त्यामुळे शेकडो प्रकारच्या माशांची चव त्याने चाखली होती.
हा एकदा त्याच्या आजोबांनी त्याला त्या सोनेरी माशाविषयी सांगितल्याचं लक्षात होतं. तो सोनेरी मासा समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास चार तास आत गेलं की तिथल्या खोलवर समुद्रात सापडतो, असं आजोबांनी त्याला सांगितलं होतं. त्या ज्योतिषानंही तेच सांगितलं होतं. किनाऱ्यापासून पश्चिमेच्या दिशेने चार तास होडी वल्हवत गेलं की तिथे एक छोटंसं बेट आहे. त्या बेटाच्या एका टोकाला नारळाची खूप झाडं आहेत. त्या झाडांलगतच्या परिसरात हे सोनेरी मासे सापडतात. तिथे जाऊन तो मासा पकडावा लागेल.
हे मासे एकेकटेच विहार करत त्यामुळे एकावेळी एकच मासा तुमच्या हाती लागण्याची शक्यता होती. हो पण त्यासाठी एक अट होती. एकतर एकट्यानेच तिथे जायचं. दुसरं म्हणजे यांत्रिक बोट न्यायची नाही, तिसरं म्हणजे तुम्ही जर स्वतःचे गुण आणि दोष दोन्हीही ओळखणारे असाल तरच तो मासा तुमच्या जाळ्यात सापडेल. त्या बेटावर एक विहीर आहे. त्या विहिरीत डोकावून तुमचे गुण आणि दोष दोन्ही सांगायचे. ते सांगितले की विहिरीतून प्रतिध्वनी येईल आणि तो प्रतिध्वनीच तुला त्या माशांच्या दिशेने जाण्याचा मार्ग सांगेल, असं त्या ज्योतिषाने सांगितलं होतं.
काय ती एकदाची रिस्क घेऊन टाकू आणि मग जीवन एकदम सुखी होऊन जाईल, असं म्हणत त्याने कुणालाही न सांगता त्या बेटाकडे जायचा निर्णय घेतला होता. अगदी सोनेरी मासा मिळालाच नाही तर तिथंच त्या बेटावर राहून उरलेलं आयुष्य घालवावं, असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो त्या दिवशी पहाटे चार वाजताच निघाला होता. थोडंफार खायला सोबत घेतलं होतं. पाण्याचा एक ड्रम भरून घेतला होता. सोबत दोन-चार पांघरूणं, एक-दोन जोड कपडे, बॅटरी असं आवश्यक सामान घेऊन त्याने पहाटेच्या अंधारातच होडी पाण्यात घातली होती.
पाण्यातून सपासप वल्हवत तो होडी पुढे नेत होता. सूर्यास्ताच्या आधी त्याला सोनेरी मासा पकडून परत घरी पोचायची घाई होती. पाण्यात मारलेल्या वल्ह्याचा आवाज आणि मध्येच एखाद्या समुद्री पक्ष्याची चिरीप एवढाच काय तो आवाज येत होता. होडी वेगाने पुढे सरकत होती. चार तासांनंतर तो त्या बेटावर पोचला तेव्हा सूर्य क्षितिजावर आला होता. बेटालगतच्या खडकाळ भागात समुद्री पक्षी उडत होते. एखाद्या चित्रपटात असावं तसं ते बेट होतं. त्याने होडी किनाऱ्याला बांधली आणि बेटावर उतरला. भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लं आणि तो झपाझपा चालत ती विहीर शोधू लागला.
पंधरा-वीस मिनिटं चालल्यावर त्याला ती विहीर दिसली. तसा तो विहिरीजवळ गेला. त्या विहिरीत डोकावून त्याने स्वतःचे गुण सांगितले आणि दोषही कबूल केले. तसा त्यातून प्रतिध्वनी आला की, डाव्या हाताला दोनशे पावलं चालत गेल्यावर तिथे एक छोटं दगडी स्मारक लागेल. तिथून उजवीकडे वळाल्यावर पन्नास पावलांवर एक जुनाट पडकी विहीर आहे. त्या विहिरीलगतच्या पायऱ्या खाली उतरतात आणि समुद्र किनाऱ्याशी पोचतात. तिथे तुला सोनेरी मासा सापडेल. पण एक अट आहे, या पायऱ्या उतरताना चुकूनही मागे वळून बघायचं नाही. नाहीतर तुला आयुष्यात कधीच सोनेरी मासा सापडणार नाही.
एका पर्णकुटीत गुरू-शिष्यात हा संवाद सुरू होता. शिष्याला गुरू एक बोधकथा ऐकवत होता. इथपर्यंत कथा ऐकल्यावर शिष्याने विचारलं, “गुरुजी मग त्या माणसाला सोनेरी मासा सापडला का?’
गुरूंनी प्रतिप्रश्न केला, “तुला काय वाटतं, त्याला सोनेरी मासा सापडला असेल.’
शिष्य थोडा वेळ विचार करत राहिला आणि म्हणाला, “गुरुजी तुम्हीच सांगा, मला काही अंदाज येत नाही.
मग गुरुजी सांगू लागले, “वत्सा, हा सोनेरी मासा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मन आहे. मनाचा हा सोनेरी मासा संयमाच्या जाळीत अडकत नाही म्हणून तर प्रत्येक जीव दुःखी आहे. आपण संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून अपेक्षा करतो. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की मग नैराश्य येतं आणि नैराश्य आलं की आयुष्य दुःखाने ग्रासायला सुरवात होते. पण हा अपेक्षा, निराशा, दुःखाचा सगळा खेळ थेट मनाशी जोडलेला आहे. म्हणूनच मनाच्या सोनेरी माशाला आपण आपल्या कर्तृत्वाने संयमाच्या जाळ्यात पकडले पाहिजे. हे जो करू शकतो तोच यशस्वी होतो.’
शिष्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. गुरुजी सांगू लागले. हे संपूर्ण जगत हा चित्ताच्या म्हणजेच मनाच्या शक्तीचा विलास आणि विस्तार आहे. थोडक्यात मनरूपी माशाची सोनपावलं आहेत… शिष्याने गुरूला नमस्कार केला आणि सोनेरी माशाला जाळ्यात पकडण्यासाठी वास्तवाच्या प्रांजळ क्षितिजाच्या दिशेने चालू लागला.
– बी. चंद्रदास