सोलापूर – सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय, आपण चार दिवसाचा वेळ दिला होता. पण आता ती वेळ संपली आहे. आता कुणालाही सुट्टी नाही. एक महिना मागितला, दिला, आपण वरून दहा दिवस दिले, पण आता एक घंटा सुद्धा वाढवून देणार नाही, आता सरकारला (Shinde fadanvis sarkar) वळवळ सुद्धा करू देणार नाही. आपला पहिला आणि शेवटचा लढा समजून इतक्या ताकदीने लढायचा की, मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलेच पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation update) राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आज ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौऱ्यावर होते. जरांगे-पाटील म्हणाले की, आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटेंपर्यंत बलिदान दिले असून काकासाहेब शिंदेपासून आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नसेल तर पहिला आणि शेवटचा लढा समजून इतक्या ताकदीने लढा की, मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे.
आरक्षणासाठी मराठा (Maratha Arakshan) समाजाला मागास सिद्ध असणे गरजेचे आहे. गायकवाड समितीने 12- 13 टक्के आरक्षण दिले जाऊ शकते, असे म्हटले आहे. यासाठी एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो. विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, म्हणून आपल्यालाही ते हवे आहे. तसेच मराठा समाजातील काही नेते विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनेकजण माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या समाजाचं लेकरु असून मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही. खुळखुळा वाजवणारा दिसतो म्हणून काहींनी मला हलक्यात घेतले. पण मी साधा नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.