मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तडकाफडकी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, परमवीर सिंग यांनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे की वाझेला दर महिन्याला 100 कोटी अनिल देशमुखांना द्यायला लागत होते. वाझेला कलेक्शन करण्यासाठीच पुन्हा घ्यायला लावले हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. आता संजय राऊत यांनाच ग्रहमंत्री पद द्या, असा घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.