ठाणे – राज्यातील राजकारण सातत्याने नवनवी वळणं घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्यापासून (गुरूवार) राज्यव्यापी दौरा करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला मजबूत करणे आणि स्वत:चे राजकीय स्थान भक्कम करणे हा त्या दौऱ्यामागील उद्देश आहे.
ठाणे शहर हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तिथूनच त्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. त्यासाठी उद्या सायंकाळी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत शिंदे ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल. पुढील वर्षाच्या पूर्वार्धात लोकसभेची, तर उत्तरार्धात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुका विचारात घेऊन शिंदे यांनी राज्यव्यापी दौऱ्याचा संकल्प केल्याचे सांगितले जात आहे. पण, बदललेल्या राजकीय स्थितीत ते दौऱ्यावर निघाल्याने तर्क-वितर्कांनाही खतपाणी मिळणार आहे.
वर्षभरापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली अन् महाविकास आघाडी सरकारला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले. राजकीय भूकंप म्हणून पाहिल्या गेलेल्या त्या घडामोडींनी शिंदेसेनेला सुखद धक्का दिला. त्याचे कारण म्हणजे शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यातून शिंदे यांचे राजकीय वजन लक्षणीयरित्या वधारले. शिंदेसेनेला अधिकाधिक ताकद देण्यासाठी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याचे मानले गेले.
वर्षभरात घडलेल्या घडामोडी शिंदेसेनेला सुखावणाऱ्या होत्या. मात्र, चालू महिन्याच्या प्रारंभी आणखी एक राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट राज्य सरकारचा भाग बनला. त्या घडामोडी म्हणजे शिंदेसेनेला अस्वस्थ करणारा राजकीय धक्का ठरला. काही नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून ती अस्वस्थता उघडही झाली.
अजित पवार गटाच्या सहभागामुळे राज्यातील सत्तेचे भागीदार वाढले आहेत. त्यातून आगामी निवडणुकांमध्ये होणाऱ्या जागावाटपासाठीची रस्सीखेचही वाढणार आहे. एवढेच नव्हे तर, प्रत्यक्ष निवडणुकांत अधिकाधिक जागा जिंकून आपला प्रभाव दाखवण्याचे आव्हानही सत्तेतील प्रत्येक भागीदाराला पेलावे लागणार आहे. त्यातून त्यांची राजकीय प्रतिष्ठा आणि भवितव्य पणाला लागणार आहे. सातत्याने राजकीय उलथापालथी अनुभवणारे राज्यातील राजकारण पुढील काळात आणखी कुठल्या वळणावर जाणार याचे भाकीत करणे भल्याभल्या जाणकारांनाही अवघड होऊन बसले आहे. बहुधा त्याची जाणीव झालेले शिंदेही आता सावध आणि सज्ज झाले आहेत. त्यातून ते आता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे मानले जात आहे.