आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवायचा प्रयत्न केला; परंतु त्यामध्ये अजूनही यश मिळालेले नाही.
पूंछच्या सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपले काही जवान शहीद झाले. या भागात तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. एलओसीला लागून असलेल्या सुरनकोटमध्ये ही चकमक झाली. अनंतनागमधील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दुसरी, चकमक बांदीपोरा जिल्ह्यामध्ये झाली. ठार झालेला दहशतवादी अहमद डार हा लष्कर-ए-तोयबाचा (टीआरएफ) होता. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत काश्मिरी पंडित, शीख समुदायाशी निगडीत सात नागरिकांची दहशतवाद्यांकडून हत्या घडवून आणण्यात आली.
यानंतर सुरक्षा दलाकडून जवळपास 700 हून अधिक बंदी घालण्यात आलेल्या “जमात ए इस्लामी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित व दहशतवाद्यांच्या “ओव्हरग्राउंड वर्कर्स’ना पकडले. श्रीनगरमध्ये एका शाळेत घुसून सुंदर कौर आणि दीपक चंद या दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली. यातील एक शीख आणि दुसरा हिंदू असल्याने त्यांना “टार्गेट’ केले. श्रीनगरमध्ये औषध दुकानांचा मालक 70 वर्षीय माखनलाल बिंदरू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. इतर दोन नागरिकांत टॅक्सी चालक मोहम्मद शफी आणि पाणीपुरी विक्रेता वीरेंद्र पासवान यांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांकडून हिंदू आणि शीख समाजातील निष्पाप नागरिकांची हत्या घडवून येत असल्याने त्यांचे पलायन सुरू झाले आहे. या भागातील अल्पसंख्याक नागरिकांविरोधात हिंसाचाराच्या घटनांत अचानक वाढ का झाली? तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान तालिबानी दहशतवाद्यांचा वापर करून काश्मीरमध्ये दहशतवादाला पुनर्जीवित करेल हे अपेक्षित होते आणि तेच झाले.
पाक लष्कर प्रभावहीन करण्यासाठी काय करता येईल, पाक लष्कर ही केवळ भारताची समस्या नसून सर्व जगाला अडचणीचे ठरू शकते, यासाठी आपल्याला एक सर्वसमावेशक राजनैतिक मोहीम कायम सुरू ठेवावी लागेल.
दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या देशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स या संघटनेने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. अधिकृतपणे पाकिस्तान काळ्या यादीत गेला तर परदेशी गुंतवणुकीचा ओघ थांबेल. यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडेल. पाकिस्तानला त्याच्या स्वतःच्याच औषधाची चव चाखवली गेली पाहिजे. पाकिस्तानची सिंध, बलुचिस्तान आणि एन.डब्ल्यू.एफ.पी. ही राज्ये गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. तिथे फुटीर चळवळी अस्तित्वात आहेत.
भारतही छुपे युद्ध, बलुचिस्तान आणि एन.डब्ल्यू.एफ.पी. ह्या पाकिस्तानी प्रांतांत नेण्याकरता उपाय करू शकतो. पाकिस्तानी सैन्य छुप्या युद्धात गुंतले आणि सैनिकांचे प्राण अधिक गमावू लागले की, त्यांना जम्मू आणि काश्मिरात दहशतवाद्यांना आधार देणे थांबवावे लागेल. पाकिस्तानने भारतास आणि भारतीय सैन्यास, अफगाणिस्तानमध्ये/ नेपाळमध्ये/बांगला देशात लक्ष्य केलेले आहे.
आपण पण त्यांचा सामना या सर्वच देशांत करू शकू काय? याकरता काही उपाय अंमलात आणले जाऊ शकतात. दहशतवाद संपवण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करणे जरुरी आहे. आर्थिक-सामर्थ्य युद्ध (इकॉनॉमिक वॉर फेअर), माहिती युद्ध (इन्फॉर्मेशन वॉर फेअर), विजकीय युद्ध (इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर), गुप्तचर दल इत्यादींचा पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी वापर केला जावा.
बलुचिस्तान, एफ.ए.टी.ए.मधील मानवी हक्क भंगांबाबतची आपली चिंता सातत्याने व्यक्त करू शकू काय? पाकिस्तानातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील मानवी हक्क भंगांची प्रकरणे समोर आणू शकू काय?
पाकिस्तान आपल्या देशात अंमलीपदार्थांचे व्यसन रुजवत आहे. नार्को टेररिझम म्हणजे अफू, गांजा, चरसचे युद्ध चालवत आहे. याविषयी आपण जगाला माहिती देऊ शकतो का? आणि पाकिस्तानला वाळीत टाकण्याकरता प्रयत्न करू शकतो का? पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस.आय. विरुद्ध आपण माहितीयुद्ध छेडू शकू काय?
थोडक्यात, त्यांच्याविरुद्ध एक सर्वसमावेशक सायबर युद्ध सुरू करण्याची गरज आहे. सिंध आणि बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला यश मिळाल्यानंतर ते स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित केले जावे. म्हणजेच सध्याचा पाकिस्तान कमकुवत होईल. यामुळे पाकिस्तानची भारताच्या विरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्याची क्षमताही कमी होईल.
दखल
हेमंत महाजन