तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ निश्चित । वोळख तूं ।। 72 ।।
वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।। 73 ।।
जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ।। 74 ।। ज्ञानेश्वरी अध्याय क्र. 4 था माऊली म्हणतात, जे जे मनुष्याच्या मनात असते ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे. म्हणून कर्मावाचून फल देणारे आणि कर्म कर्मकर्त्यावाचून फल घेणारे दुसरे कोणतेही योग्य कारण उपलब्ध नाही.
म्हणून या मनुष्यलोकामध्ये कर्म असेल तर फल नसेल तर नाही. म्हणजेच कर्म हेच सूचक म्हणजे फल साधक आहे; हे सिद्ध होते. जसे शेतात जे पेरावे तेच उगवते; दुसरं काही उगवतच नाही किंवा आरशात जे पाहावे तेच आरशात दिसते.
त्याप्रमाणे वाईट कर्म केले, तर दुःख आणि चांगले कर्म केले तर आनंद प्राप्त होईल.