नवी दिल्ली – जम्मू काश्मीर पुन्हा हादरलंय. जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत. राष्ट्रीय भूंकपविज्ञान केंद्राने (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी) दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूंकपाची तीव्रता 4.2 इतकी मोजण्यात आली. सोमवारी सकाळी 10 वाजून 42 मिनिटानी आलेल्या भूकंपाच्या केंद्राची खोली पृष्ठभागापासून अवघ्या पाच किलोमीटर खाली होती.
यापूर्वी शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.8 इतकी नोंदली गेली होती तर भूकंपाची खोली पृष्ठभागापासून 120 किलोमीटर खाली होती. शनिवारच्या आधी गुरूवारी गुलमर्ग येथेही सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी 3.7 तीव्रतेचा भूंकप झाला होता. त्याआधी मंगळवारीसुध्दा जम्मू- काश्मीरमध्ये भूंकपाचे धक्के जाणवले होते आणि त्यावेळी भीतीपोटी लोक घराबाहेर आले होते.
यापूर्वीही 11 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी नोंदली गेली होती. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1.53 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र भारत-पाकिस्तानची सीमा असल्याचे सांगण्यात आले होते. भूंकपाच्या केंद्राची खोली पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होती.
दरम्यान, भूकंपाच्या बाबतीत जम्मू-काश्मीर हे संवेदनशील क्षेत्र असल्याचे मानले जाते. भूकंपामुळे पूर्व भागात काश्मीरमध्ये बर्याच वेळा नुकसान झाले आहे. 8 ऑक्टोबर 2005 रोजी काश्मीरमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील 80 हजार लोक मारले गेले होते.