नेवासा – तिथे गेले त्याच्यावर काही दडपण असेल. तिथे रहायचे आनंदात रहा. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. दाखवा तुम्ही काय काम केले. तुम्ही का गद्दारी केली, हे लोकांना पटवून द्या. महाराष्ट्र कधी गद्दारी खपवून घेत नाही आणि घेणारही नाही, असा इशारा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिला.
ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते सोडून गेले, मात्र संकटाच्या काळात आमदार शंकरराव गडाख यांनी मैत्री जपली. गडाख कुटुंबीयांनी शिवसेनेला दिलेली साथ व आमच्यावर दाखवलेला विश्वास कधीच विसरणार नाही, असे यावेळी ठाकरे म्हणाले.
शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आदित्य ठाकरे व माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौका शिवसेनेचे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक जमले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
जोरदार पावसात ठाकरे यांनी शिवसैनिकांबरोबर संवाद साधला. यावेळी संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार अंबादास दानवे, राजेंद्र दळवी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, आ.गडाख यांनी सोनई येथे शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी घेतलेली सभा मला प्रोत्साहन, ऊर्जा व हिंमत मिळाली. संकटात दिलेली साथ कधीही विसरणार नाही. सध्याचे सरकार हे अल्प आयुचे असून ते टिकणारे नाही. भर पावसात तुमचे आशीर्वाद घ्यायला याला दौऱ्याच्या माध्यमातून आलो आहे. शिवसंवाद यात्रे दरम्यान शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे राज्यभरात मिळत असलेले प्रेम हे कशातच मिळणारे नाही.
ते म्हणाले, त्यांनी ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरे व शिवसेने विरोधात केलेली नाही. तर महाराष्ट्र व माणूसकी विरोधात गद्दारी केली आहे. लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार आहे. लवकरच हे राज्य सरकार कोसळणार आहे. मतदान करताना हे लक्षात ठेवा की मत तुम्ही कोणाला देणार आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
उदयन गडाख म्हणाले, नेवासे तालुक्याची संपूर्ण ताकत ही शिवसेनेचे पाठीशी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांना खंबीर साथ देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उदयन गडाखांचे उत्कृष्ट नियोजन
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचे स्वागत व नेवासे फाटा येथील कार्यक्रमाचे नियोजन पूर्णपणे युवानेते उदयन गडाख यांनी केले. नेवासे फाटा येथील कार्यक्रमाचे ठिकाण असलेले राजमुद्रा चौक व परिसर भगवामय झाला होता. विशेषतः ठाकरे यांच्या स्वागताला उदयन यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो तरुणांची उपस्थिती व या तरुणांचा उत्साह विशेष होता. यावेळी भर पावसात स्वतः उदयन यांनी दिलेल्या जय भवानी..जय शिवाजी..च्या घोषणेला तरुणांनी दिलेल्या प्रतिसादाने नेवासा फाटा व परिसर दणाणून गेला होता.