छत्तीसगड – दारूच्या व्यसनामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे अनेकदा दारू न पिण्याचे आवाहन केले जाते. मात्र आता छत्तीसगडचे उत्पादन शुक्ल मंत्री कवासी लखमा यांनी ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत दारुबंदी होणार नाही,’ अशी घोषणा केली. तसेच ‘दारू प्यायल्याने कोणी मरत नाही, तर दारू जास्त प्यायल्याने मरतात’, असे खळबळजनक विधान देखील त्यांनी केले आहे.
लखमा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, “दारू प्यायली नाही तर माझ्याच्याने कामही होणार नाही. नगरपालिकेसह एमएमडीसीची खाण आणि इतर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दारू लागले. दारुमुळे वेदना विसरता येते. राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आणि ब्रिजमोहन अग्रवाल यांना हे कळणार नाही. कारण त्यांनी उभ्या आयुष्यात एकदाही गोणी उचलली नसेल किंवा अवजड काम केले नाही”, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “दारू प्यायल्याने कोणी मरत नाही, तर जास्त दारू प्यायल्याने मरतात. विदेशातील 100 टक्के, तर बस्तरमधील 90 टक्के लोक दारूचे सेवन करतात. बस्तरमध्ये दारूबंदी कधीच होणार नाही. कारण येथे सांस्कृतिक कार्यक्रमातही दारूचे सेवन केले जाते. ही परंपरा पुरातन काळापासून चालू आहे. त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत दारुबंदी होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
#WATCH | Chhattisgarh Excise Minister Kawasi Lakhma says, “There will be no liquor ban in Bastar as long as I am alive”.
(09.04) pic.twitter.com/6zoFdwDiVU— ANI (@ANI) April 10, 2023
दरम्यान, याआधी शुक्रवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दारूबंदीबाबत मोठी घोषणा केली होती. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. जोपर्यंत लोक दारू पिणे बंद करत नाहीत, तोपर्यंत दारूबंदी होऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते.