मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमधून ढावललं जात असल्याची चर्चा सतत होत आहे. 2019 मध्ये त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. याबाबत त्यांनी स्वत: नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता एका रासपच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी भाजपची आहे पण भाजप थोडीच माझा आहे’ असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत. पण भाजप त्यांना आपलं मानत नाही असे त्यांना बोलायचे होते. गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र भाजपला आजचे दिवस दाखवले. मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे.”
पुढे राऊत म्हणाले की, “आम्हाला मुंडे परिवाराविषयी गोपीनाथ मुंडेंमुळे कायम आस्था आणि प्रेम राहील. ते असते, तर शिवसेना-भाजप युतीला वेगळी दिशा मिळाली असती. पण गोपीनाथ मुंडे नसल्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकारणात वाताहत केली जात आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, तरच तुम्ही राजकारणात टिकून राहू शकता. नाहीतर तुम्ही राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे. आमच्यावर अन्याय होत आहे, अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही”, असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
बुधवारी दिल्लीतील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, “भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही.” यावेळी त्या “आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. राष्ट्रीय समाज पक्ष हा माझं माहेर आहे. माझ्या भावाचं घर आहे, ” असेही त्या म्हणाल्या.