पिंपरी-भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत माझी बैठक झालेली नाही. विरोधी पक्ष म्हणून राजकारणात संवाद असणे हे आवश्यक आहे. कलाकृतीसाठी निमंत्रित करणे गरजेचे आहे. यातून जवळीक होते, दुसऱ्या पक्षात जाणार असा अर्थ होत नाही असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले.
गुरुवारी शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील हे देखील शहरात होते आणि त्यांनी पुढील निवडणूक आपण शिरुर मतदारसंघातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच डॉ. कोल्हे भाजपमध्ये गेल्यास त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य केले होते. याबाबत डॉ. कोल्हे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या सर्व प्रश्नांना बगल देत याबाबत 17 तारेखला बोलू असे सांगत सूचक मौन बाळगले.
डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचे पिंपरीत दि. 11 ते 16 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते.
खासदार कोल्हे पुढे म्हणाले, शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय माध्यमातून समजला. याविषयी जास्त भाष्य करणे फार उचित ठरणार नाही. मात्र, गेली सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याभोवती फिरत आहे. पक्षाध्यक्ष पदाबाबत पवार हे पूर्ण विचारांती निर्णय घेतील, ही महाराष्ट्राला खात्री आहे. अध्यक्ष निवडण्यासाठी नेमलेली समिती पाहिल्यानंतर पक्षात दोन गट पडले नाहीत हे स्पष्टपणे दिसते. जो अध्यक्ष निवडला जाईल, तो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. तसेच गेली सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार यांच्याभोवती फिरत आहे. पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरताना मी बालपणापासून पाहिले आहे. शरद पवार यांचा आवाका, संसदेतील कामकाज, पक्षात काम करताना मी जवळून पाहतो.
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद कमी झाला असल्याबाबत कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी नियमितपणे संवाद सुरू आहे. लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत बुधवारीच बोलणे झाले.