पुणे – भामा-आसखेड योजनेचे पाणी चंदनगरपर्यंत येणार असल्याने हे पाणी वाघोलीपर्यंत आणणेही शक्य आहे. पूर्व भागातील नगररस्ता भागासाठी भामाआसखेडच्या पाण्याचे नियोजन असताना महापालिकेत समावेश झालेल्या वाघोलीवर पाण्याबाबत अन्याय करण्यात येवू नये, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केली आहे.
पुणे महापालिकेत वाघोली गावाचा समावेश करण्यात आल्याने पाणी पुरवठा संदर्भातील विषयांवर पालिकेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भामाआसखेडचे पाणी वाघोली गावासाठी उपलब्ध होऊ शकते, ही बाब ज्ञानेश्वर कटके यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली.
वाघोली पाणी पुरवठ्याची स्थिती नमूद करताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेबाबत वाघोलीवर नेहमीच अन्याय झाला आहे. जागतिक बॅंक पाणी पुरवठा योजना राबवितानाही योजनेचा 30 टक्के खर्च ग्रामपंचायतीवर शासनाने लादला होता. वास्तविक या योजनेचा लाभ वाघोलीपेक्षा चंदननगर, खराडी, वडगावशेरी या भागालाच अधिक झाला. या योजनेची पाणीपट्टी (कर) भरण्याचा दबावही ग्रामपंचायतीवर होता. परंतु, योजनेचे पाणी आलेच नाही तर कर कसा भरणार? यामुळे गावाने स्वत:ची पाणी योजना राबविताना पीएमआरडीच्या माध्यमातूनही 25 कोटीची पाणी योजना राबविली आहे.
परंतु, वाघोलीचे वाढते नागरिकरण तसेच गृह प्रकल्पांची वाढती संख्या यातून नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यातही वाघोलीचा समावेश महानगरपालिकेत झाल्याने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आता पालिकेचीही आहे. याअनुषंगाने भामाआसखेड योजनेचे पाणी वाघोलीपर्यंत आले तर या भागास पुरसा पाणी पुरवठा होऊ शकेल, ही बाब महापौर तसेच संबंधीत अधिकाऱ्यांच्या निर्दनास कटके यांनी आणून दिली आहे. याबाबत महापौर मोहोळ यांनीही सकरात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
वाघोलीत ग्रॅव्हिटीने आणता येईल पाणी…
पूर्व भागाला लष्कर, वारजे जलकेंद्रासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. भामा-आसखेड प्रकल्पातूनही पूर्व भागातील नगर रस्ता परिसरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर या परिसरात भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार आहे. खराडीपासून वाघोली अवघ्या 5 कि.मी. अंतरावर आहे. विशेष म्हणजे खराडी ते वाघोलीपर्यंत तिव्र उतार आहे. भामाआसखेड धरणातून 8 कि.मी.पर्यंत पाणी जॅकवेलने पंपिंग करून आणले आहे तर पुढे 34 कि.मी. पर्यंत पाणी पाईपलाईन ग्रॅव्हिटीने आणलेले आहे. असाच प्रयोग वाघोलीपर्यंत करता येवू शकेल, याकरीता वाढीव निधीची गरज नाही, अशा तांत्रिक बाबीही जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी या बैठकीत महापौर तसेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.