चेन्नई – भारतीय जनता पार्टीशी लोकसभेत युती होणार नसल्याचे संकेत अण्णाद्रमुकच्या (AIADMK) नेत्याने दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचा ( BJP) सूर जरा नरमला आहे. अण्णाद्रमुकशी आमचा कोणताही संघर्ष नसल्याचा दावा भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी केला आहे. अद्रमुकच्या कोणत्याही नेत्याची आम्हाला कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतील समविचारी पक्षांना एकत्र जोडणारा धागा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी स्विकारणारे सगळेच पक्ष एनडीएचा घटक आहेत. अण्णाद्रमुकलाही ही बाब मान्य आहे आणि मोदी यांचे नेतृत्व स्विकारणाऱ्या सगळ्या पक्षांची हातमिळवणी झाली पाहिजे असे अन्नामलाई यांनी म्हटले आहे.
अन्नामलाई पुढे म्हणाले की आपण द्रविड आयकॉन आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्याबाबत काहीही बोललो नव्हतो. आपण केवळ 1956 मधील घटनेचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्या विषयावर मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.
द्रमुक नेते एम करूणानिधी राज्याचे मुख्यमंत्री असताना आपल्या कार्यकाळात त्यांनीही याच घटनेचे (1956) स्मरण केले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. वैचारिक दृष्ट्या विचार केला तर अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे पक्ष आहेत. मात्र असे वैचारिक मतभेद असणे मोठी बाब नाही. महत्वाची बाब ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अण्णाद्रमुक मजबूत नेतृत्वाद्वारे देशाला एकजूट ठेवण्याच्या विचारावर सहमत आहेत.
सोमवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजीच अण्णाद्रमुकच्या एका नेत्याने घोषणा केली होती की त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष नाही. भाजपसोबत आघाडी करण्याचा कोणताही निर्णय निवडणुकीच्या वेळी घेतला जाईल. त्यानंतर आता अन्नामलाई यांचे हे विधान आल्यामुळे भाजप नमती भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे मानले जाते आहे.