संगमनेर – जनतेच्या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग सर्वसामान्यांच्या विकासाकरिता केला. निळवंडे धरण व कालव्यासाठी दररोज पाठपुरावा करून हे ऐतिहासिक काम पूर्ण केल्यानंतर कालव्यांद्वारे पाणी दुष्काळी भागात आले असून, हे पाणी जास्तीत जास्त क्षेत्राला मिळेल, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
चिंचोली गुरव येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर आ. सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, शंकर खेमनर, संपतराव गोडगे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, अजय फटांगरे, बेबीताई थोरात, भारत मुंगसे, सरपंच उषा दिघे, विलास सोनवणे, विलास अण्णा सोनवणे, सोमनाथ आभाळे, संगीता बर्डे, स्वप्नील गोडगे आदी उपस्थित होते. या वेळी सुमारे 25 कोटींच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
आ. थोरात म्हणाले की, चिंचोली गुरवची पाणी परिषद ही निळवंडे धरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून, 1999ला निळवंडे धरणाचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले. सन 2012ला भिंतीचे काम पूर्ण झाले. याच कालावधीत मोठमोठ्या बोगद्यांच्या कालव्यांची कामे मार्गी लागली होती. मात्र, 2014 ते 2019 कामे थंडावली होती.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच या कामाला गती दिली. या उन्हाळ्यामध्ये दहा टीएमसी पाणी धरणात शिल्लक होते. अशावेळी कालव्यांची चाचणी घेण्यासाठी सरकारला आग्रह केला. कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी आले. मात्र, ते काही लोकांना पाहवले नाही. त्यांनी तत्काळ पाणी बंद केले.
माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, देशात सध्या जातीच्या नावावर राजकारण करणारे सरकार असून, मणिपूरमध्ये महिलांवर मोठा अत्याचार होतो आहे.अत्यंत बेजबाबदार राज्यकर्ते सरकारमध्ये असून, लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आ. थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. आ. सत्यजित तांबे म्हणाले की, आ. थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला असून निधीसाठी पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे असते. आ. थोरात यांनी निळवंडे धरणासह तालुक्यातील मोठमोठी कामे केली असून, यामुळेच ते खऱ्या अर्थाने विकास पुरुष ठरले आहेत.