100 दशलक्ष टन उत्पादन होण्याची अपेक्षा
साखर व्यापार संघटनेची राष्ट्रीय परिषद
पुणे – दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीमुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट झाली असली, तरी आगामी वर्ष हे उस पिकासाठी चांगले राहणार आहे. यावर्षी साधारणत: ऊसाचे उत्पादन सुमारे 100 दशलक्ष टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत हे मत मांडण्यात आले.प रिषदेचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील प्रमुख साखर उत्पादक क्षेत्र असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूर परिस्थतीचा फटका हा ऊसाला बसला आहे. त्यामुळे राज्यातील 189 पैकी 137 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. त्यातील काही कारखाने आता गाळप बंद करत आहेत. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील म्हणाले, साखरेचे उत्पादन यंदा 55 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. गेल्यावर्षी तब्बल 93 टक्के साखरेचे उत्पादन झाले होते. पुढील वर्षी मात्र शंभर टक्के साखरचे उत्पादन होईल.
उद्घाटनपर भाषणात राणा म्हणाले, चांगले पीक आणि सरकारकडून मिळालेल्या किमतीमुळे उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना यंदा 84 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तेच गेल्यावर्षी म्हणजे 2017-18 मध्ये 35 हजार 400 कोटी रुपये वाटले होते.