ना. आदित्य ठाकरे ः अमृतवाहिनीत तरुण आमदारांचा विद्यार्थ्यांशी संवादशरद पवारांनी त्यांचे गर्वहरण केले ः रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, शरद पवार हे या वयातही समाजकारणात सक्रिय आहेत. राज्यातील अनेकांना वाटले ते निवृत्त होतील. परंतु गर्व करणाऱ्यांचे त्यांनी गर्वहरण करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा मंत्र त्यांनी तरुणांना दिला आहे. नगर जिल्हा नावात सोपा आहे. मात्र राजकारणात खूप अवघड असल्याचे ते म्हणाले.
संगमनेर – आम्ही ज्या घराण्यांतून आलेलो आहोत, ती सर्व घराणी अनेक वर्षे राज्यातील समाजकारणात कार्यरत आहेत. लोकशाही पद्धतीने आम्ही राजकारणात आलो असून, राज्यातील तरुणांच्या व जनतेच्या अपेक्षापूर्तीसह नवमहाराष्ट्र निर्मितीत सक्रिय काम करू, असे तरुण आमदारांनी दिलखुलास मुलाखतीत म्हटले. नवीन दशक हे महाविकास आघाडीचे असणार असल्याचा विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
अमृतवाहिनीतील मेधा महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात ना. ठाकरे, पर्यावरण व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज विलास देशमुख, आ. ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांनी सहभाग घेतला. गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या तरुण आमदारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, कांचन थोरात, राजवर्धन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, विश्वस्त शरयू देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते. या मुलाखतीची सुरुवात इस बंदे मे है कुछ बात, ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात या गीताने टाळ्यांच्या कडकडात झाली.
ना. ठाकरे म्हणाले, नवीन दशक हे महाविकास आघाडीचे आहे. राज्याच्या विकासासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांतील युवक राजकारणातील वसा घेऊन काम करत आहेत. मी ही लोकशाही पद्धतीने राजकारणात आलो आहे. वडिलांची नम्रता ही मला प्रेरणा देते. सर्वांना सोबत घेऊन ते काम करत आहेत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारणात कधी गर्व करू नये, ही सर्वांनी शिकलं पाहिजे.
मला तरुणांच्या अपेक्षापूर्ती शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. मंत्री म्हणून घेतलेली शपथ आपल्या जीवनातला सर्वांत अनमोल ठेवा आहे, असे ते म्हणाले. धीरज देशमुख म्हणाले, माझे वडील हे माझे खरे हिरो आहेत. आता इतर तरुणही विलासरावजी देशमुख हे आपले हिरो आहेत, असे म्हणतात. त्यावेळी वडिलांचा खूप अभिमान वाटतो. मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे हे विलासराव देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.
ना. थोरात प्रास्ताविकात म्हणाले, मेधा उत्सवाअंतर्गत वैचारिक प्रबोधन, संस्कृती, कला, क्रीडा या सर्व जपल्या जात असून, तरुणांना मोठे व्यासपीठ मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील तरुणांचा आपल्या विद्यार्थ्यांची संवाद घडावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी ऍड. माधवराव कानवडे, आर. बी. सोनवणे, लक्ष्मण कुटे, डॉ. जयश्री थोरात, प्राचार्य डॉ. व्यंकटेश, प्रा. व्ही. बी. धुमाळ, मेधाचे समन्वयक व प्राध्यापक जी. बी. काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, जे. बी. सेठी, प्राचार्या शीतल गायकवाड, डॉ. राकेश रंजन, प्रा. विजय वाघे, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे आदी उपस्थित होते. स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले, तर प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनी आभार मानले.