मुंबई – करोना आणि पुरस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात मुख्यमंत्री घरातच बसून होते अशी टीका भाजपकडून केली जात आहे त्या विषयी पत्रकारांनी आज पवारांना विचारले असता ते म्हणाले की, एकेठिकाणी बसून मदतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करा अशी विनंती आम्हींच मुख्यमंत्र्यांना केली होती.
राज्यकर्त्यांनी योग्य नियोजन करून निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना तशी विनंती केली होती असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाचे पहाणी दौरे या आधीच सुरू केले आहेत.
महाराष्ट्रापुढे सध्या भीषण आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला असून त्यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे कर्ज काढण्याखेरीज पर्याय उरलेला नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार सध्या मराठवाड्याच्या पूरस्थितीच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या पावसाचा मोठा फटका पुणे, औरंगाबाद, आणि कोकण विभागाला बसला असून सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चार जिल्ह्यातील चाळीस हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. या पुरग्रस्तांना मदत करण्याच्या विषयासंबंधात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत असे ते म्हणाले. या पुरामुळे नांदेड, उस्मानाबाद, सोलापुर, आणि पंढरपुर या भागात मोठे नुकसान झाले आहे. सोयाबिन आणि उसाचे मोठे नुकसान यात झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. राज्यांना मदत करताना पक्षीयदृष्टीकोन दूर ठेवण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गुजरात मध्ये भूकंप आला असताना त्या विषयीच्या मदत समितीचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवले होते याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली.